जिल्ह्यात 1 हजार ४६३ ईपास वितरण.

नऊ हजार ५०० अर्ज विचाराधीन

रत्नागिरी:-संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवांकरिता ऑनलाइन पास दिले जात आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 463 पास दिले गेले असून आणखी 9 हजार 500 अर्ज विचाराधीन आहेत, अशी माहिती अपर जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी दिली.

रत्नागिरी जिल्ह्याच्या शहरी भागात दुचाकीसह सर्वच वाहनांच्या वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. मात्र अत्यावश्यक सेवेसाठी अधिकृत ई-पास घेणाऱ्यांना वाहतूक करता येऊ शकेल. नागरिकांना अत्यावश्यक सेवा-सुविधा मिळाव्यात आणि त्यासाठी घराबाहेर पडता यावे, यासाठी प्रशासनाने पास देण्याची प्रक्रिया सुरू केली.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून अत्यावश्यक सेवा-सुविधांसाठी पास मिळण्यासाठी केलेल्या या सुविधेचा काहीजण गैरफायदा घेताना आढळू लागले आहेत. काही दिवसांपूर्वी अत्यावश्यक सेवा घरपोच पोहोचवण्यासाठी स्वयंसेवकांची नावे मागवण्यात आली. काही पासदेखील देण्यात आले. मात्र असे पास घेऊन संचारबंदीच्या काळात ते विनाकारण फिरताना आढळून आले. पोलीस दलातर्फे देण्यात येणाऱ्या ऑनलाइन पास प्रक्रियेतदेखील काहींनी पास मिळवल्याची माहिती समोर आली आहे. अनावश्यक पास घेणाऱ्याची संख्या वाढल्याने पोलीस प्रशासनाने सावध भूमिका घेतली आहे. योग्य प्रकारे पडताळणी करूनच ई पास देण्याची कार्यवाही पोलीस प्रशासनाकडून हाती घेण्यात आली आहे.