रत्नागिरीत कोरोना नियंत्रणात.

आतापर्यंत 46 पैकी 45 जणांचे नमुने निगेटीव्ह

रत्नागिरी:- जिल्ह्यात विविध शासकीय रुग्णालयात कोरोनाशी संशयित म्हणून दाखल झालेल्या रुग्णांपैकी 46 जणांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील 45 जणांचे नमुने निगेटीव्ह आले आहेत. त्यात मंगलोर एक्स्प्रेसने प्रवास करणार्‍या सहा जणांचाही समावेश आहे. त्या सहा जणांना जिल्हा शासकीय रुग्णालात निगराणीखाली ठेवण्यात आले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात 1 रुग्ण कोरोना पॉझिटिव आढळल्यानंतर यंत्रणा सतर्क झाली होती. त्यानंतर यंत्रणेने परदेशासह, परराज्य ,परजिल्हातून येणार्‍या नागरिकांवर वॉच ठेवला होता. जिल्ह्यात आतापर्यंत 77 जणांना कोरोना संशय म्हणून शासकीय रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यातील कोरोना आजाराशी साम्य असणार्‍या एकूण 51 रुग्णाच्या थुकी, स्वाबचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी 46 जणांचे अहवाल प्राप्त झाले. शृंगारतळीतील एकमेव रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर इतर 45 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पाच रुग्णांचे अहवाल प्रलंबित असून साखरपा येथील 1 तरुणी शुक्रवारी (ता. 27) नव्याने जिल्हा रुग्णालयात दाखल झाली. पुणे येथून आल्यानंतर त्रास जाणवू लागल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. 25 रुग्णांना निगराणीखाली ठेवण्यात आले असून त्यांची प्रकृती उत्तम आहे त्यामुळे राज्यासह देशात कोणाचा फैलाव वाढत असला तरीही रत्नागिरी जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेने तोरणाला रोखण्यात यश मिळवले आहे.
कोकण रेल्वे मार्गावरुन धावणार्‍या मंगलोर एक्स्प्रेमसमधून एक पॉझिटीव्ह रुग्णाने प्रवास केला होता. त्याच्या आजूबाजूच्या सीटवरील प्रवाशांचा शोध सुरु होता. रत्नागिरीत उतरलेल्या सहा जणांना तत्काळ उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचे स्वाब तपासण्यासाठी प्रयोगशाळेत पाठविले होते. ते निगेटीव्ही आल्यामुळे सर्वांनीच निःश्‍वास सोडला आहे. सध्या त्यांना डॉक्टर्स्च्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.