2 हजार 900 अंगणवाड्यांचे कामकाज संपामुळे ठप्प

अंगणवाडी सेविका, मदतनीस संपाला एक महिना पूर्ण

रत्नागिरी:- मानधनवाढीसह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनिस 4 डिसेंबरपासून संपावर गेल्या आहेत. या संपाला 1 महिना पूर्ण झाला असून, जिल्ह्यातील 2 हजार 900 अंगणवाड्यांचे कामकाज संपामुळे ठप्प आहे. परिणामी 50 हजार बालकांना सक्तीने घरी बसावे लागत असून, त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिवाय त्यांना पोषण आहारापासून वंचित रहावे लागत आहेे.

अंगणवाडी कर्मचारी संघटना सीटू व अंगणवाडी कृती समितीने हे आंदोलन पुकारले आहे. अंगणवाडी ताई संपावर गेल्याने बालकांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. मासिक मीटिंग, मासिक अहवाल, ट्रेनिंग, ऑनलाईन माहिती भरणे ही कामे ठप्प झाली आहेत. प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयावर अंगणवाडी ताईंनी मोर्चा नेला
आहे. मात्र अद्याप सरकारने आंदोलकांची दखल घेतलेली नाही. अंगणवाड्या बंद असल्याने बालकांना शैक्षणिक नुकसान होत आहे. शिवाय पोषण आहारापासूनही ते वंचित राहिले आहेत. जिल्ह्यातील 2 हजार 900 अंगणवाड्या बंद आहेत. महाराष्ट्रभर हा संप सुरू आहे.

अंगणवाडी कर्मचार्‍यांची पदे ही वैधानिक पदे असून त्यांना शासकीय कर्मचारी घोषित करा वेतनश्रेणी, ग्रॅच्युइटी, भविष्य निर्वाह निधी लागू करा, अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविकांना 26 हजार रुपये व मदतनीस यांना 20 हजार रुपये दरमहा मानधन द्या. महागाई निर्देशांकाप्रमाणे सहा महिन्यांनी मानधनात वाढ करा. आहाराचा दर सर्वसाधारण बालकांसाठी 16 रु. व अतिकुपोषित बालकांसाठी 24 रु. करा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.