दा. कृ. सोमण; 15 ते 17 एप्रिल दरम्यान आयोजन
रत्नागिरी:- जिज्ञासू व हौशी खगोल अभ्यासकांच्या कार्यास उर्जितावस्था प्राप्त व्हावी, या उद्देशाने रत्नागिरी येथे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या खगोल अभ्यास केंद्राच्या सहभागाने 12 वे राज्यस्तरीय खगोल अभ्यासकांचे समेंलन रत्नागिरी येथे दि.15 एप्रिल ते 17 एप्रिल दरम्यान होणार आहे. संमेलनाच्या निमित्ताने राज्यभरातील खगोल अभ्यासक प्रथमच कोकणात एकत्र येत आहेत. खगोलाच्या विविध विषयातील व्याख्याने, निरीक्षणे प्रात्यक्षिके आणि आधुनिक माहिती सहभागींना मिळणार आहे.
विद्यमान वर्षी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या सहभागाने 12 वे राज्यस्तरिय खगोल अभ्यासकांचे संमेलन रत्नागिरी येथे आयोजित करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात प्राथमिक नियोजन करण्यासाठी राज्य खगोल मंडळाचे संस्थापक सदस्य जेष्ठ खगोल अभ्यासक व पंचांगकर्ते श्रीय दा. कृ. सोमण, ठाणे श्री. श्रीनिवास औंधकर, संचालक एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोलअंतराळ विज्ञान केंद्र औरंगाबाद आणि श्री. सचिन मालेगावकर, हौशी खगोल मंडळ, नाशिक ह्यांनी आज महविद्यालयास भेट दिली व मार्गदर्शन केले.
आपल्या कोकणाला अनेक विद्वान गणिती व खगोल अभ्यासकांची परंपरा लाभली आहे. खगोलशास्त्रावर आधारित पंचाग सुधारणेच्या शंभर वर्षांपूर्वीच्या चळवळीत मूळ कोकणातील असलेले श्री. विसाजी रघुनाथ लेले, ठाण्याचे केरोपंत छत्रे, लोकमान्य टिळक तसेच व्यंकटेश बापुजी केतकर आणि अलीकडील कृवि सोमण आणि श्री. दा. कृ. सोमण ही नावे कोकणाशी संबधित आहेत.
पाश्चात्य धर्तीवर आकाश निरीक्षणाचे ‘आकाशाचे देखावे’ हे पहिले मराठी पुस्तक तर रत्नागिरीच्या पहिल्या हायस्कूलच्या मुख्याध्यापक श्री. केळकर यांनी लिहिले आहे. रत्नागिरीतील र. ए. सोसायटीचे गोगटे जोगळेकर महाविद्यालय हे कोकणातील अग्रगण्य महाविद्यालय असून महाविद्यालयाचे खगोल अभ्यास केंद्र हे विद्यार्थी व जनसामान्यात खगोलशास्त्राविषयाची आवड निर्माण व्हावी यासाठी सुमारे एक तपाहून अधिक काळ कार्यरत आहे.
हौशी खगोल अभ्यासकांनी स्थापन केलेली राज्य खगोल अभ्यासक मंडळ ही प्रसिद्ध संस्था आहे. महाराष्ट्रात खगोल विज्ञान प्रसार करण्याच्या उद्देशाने वार्षिक संमेलने विविध ठिकाणी आयोजित करीत असते. महाविद्यालयाचे खगोल अभ्यास केंद्र हे अशा खगोल विषयात काम करणाऱ्या संस्थाच्या सहकार्याने विविध उपक्रमांचे आयोजन करीत असते.
राज्य खगोल अभ्यासकांच्या संमेलन आयोजनात सन 1998 नंतर जवळपास चोवीस वर्षाचा प्रदीर्घ मोठा खंड पडला होता. परंतु औरंगाबाद येथे 11 वे संमेलन आयोजित करून पुनः या संमेलनांची सुरुवात झाली आहे.
संमेलनाचा कालावधी पाहता एप्रिल महिन्यात कोकणात कडक उन्हाळा असत नाही तसेच नियोजित तारखांना विशेष खगोलीय घटना निरीक्षणाची विशेष संधी खगोल अभ्यासकांना मिळणार आहे.









