रत्नागिरी:- मुलांच्या आणि आजी आजोबांच्या नात्याला बळकटी देण्याकरिता 10 सप्टेंबर हा दिवस यापुढे आजी – आजोबा दिवस साजरा करण्यात येणार आहे.
शालेय वयात मुलांच्या जडणघडणीत आजी आजोबांची महत्त्वाची भूमिका असते. मुलांच्या आणि आजी -आजोबांच्या नात्याला बळकटी देण्याकरिता राज्यातील सर्व शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करून आजी -आजोबा दिवस साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
यावर्षी 10 सप्टेंबर रोजी रविवार असल्याने सोमवारी अथवा त्यानंतरच्या कार्यालयीन दिवशी जिल्हास्तर, राज्यस्तर तसेच शाळास्तरावर राबविण्यात येणार आहे. काही कारणास्तव शाळेला या कार्यक्रमाचे आयोजन करता न आल्यास शाळेकडून आपल्या सोयीप्रमाणे वर्षातून एक दिवस आजी -आजोबा दिवस म्हणून साजरा करण्यात यावा, यासंदर्भात शासनाने परिपत्रकदेखील जारी केले आहे.
सध्याची कौटुंबिक स्थिती पाहता अनेक आई-वडील नोकरी किंवा व्यवसायानिमित्त बराच वेळ घराबाहेर असतात. त्यादरम्यान पाल्यांची संपूर्ण जबाबदारी आजी आजोबांवर येते. त्यामुळे मुलांच्या नाजूक मनावर योग्य संस्कारांचा मुलामा देण्यामध्ये आजी -आजोबांचा मोठा हातभार लागतो. त्यामुळे आजी आजोबांशी असलेल्या या घट्ट नात्याची ओळख होणे पाल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गरजेचे व प्रेरणादायी असते. त्यामुळे शाळांमध्ये विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आजी आजोबांना शाळेत आमंत्रित करून मुलांशी संवाद, खेळ, गप्पागोष्टी तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आदींचे आयोजन गरजेचे असल्याचेही जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.









