रत्नागिरी:- जिल्ह्याच्या किनारी भागात बुधवारी आणि गुरुवारी दिवसभर वेगवान वारे वाहत असल्यामुळे समुद्रात मासेमारीसाठी गेलेले मच्छीमार माघारी आले. समुद्र खवळल्याने अपेक्षित मासेही त्यांच्या हाती लागलेले नाहीत. त्यामुळे सुरवातीच्या पंधरवड्यात मच्छीमारांना निसर्गातील अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.
बंदी कालावधी संपल्यानंतर १ ऑगस्टपासून खराब वातावरणामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाणे टाळले होते. त्यामुळे मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले. सुमारे पाच दिवस वातावरण निवळण्याची प्रतीक्षा करावी लागली. त्यानंतर समुद्रात गेलेल्या मच्छीमारांना चालू कोळंबी, टायनी कोळंबी मिळू लागली. पावसाळ्याच्या कालावधीत रत्नागिरी, राजापूरसह गुहागर पट्ट्यात कोळंबी मोठ्याप्रमाणात सापडते. जसजसे खोल समुद्रात मासेमारी जाण्यास सुरवात झाली की बांगडा, पापलेट, सरंगा यासारखे मासे मिळू लागतात. गेले आठवडाभर परिस्थिती आटोक्यात असतानाच बुधवारी दुपारपासून अचानक वारे वाहू लागले होते. सकाळच्या सत्रात मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या नौका सायंकाळी माघारी परतल्या, रत्नागिरी, राजापूर तालुक्यातील गिलनेटसह पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांनी समुद्र खवळल्याने माघारी फिरणे पसंत केले. पाण्याला करंट असल्यामुळे जाळी टाकुनही मच्छीमारांच्या हाती काहीच लागलेले नाही. सायंकाळीही वाऱ्याचा जोर कायम होता. गेले चार दिवस पावसाने विश्रांती घेतल्यामुळे मच्छीमारांना दिलासा मिळाला होता. तसेच गिलनेटद्वारे मासेमारी करणाऱ्यांना १०० ते १५० किलो विविध प्रकारची कोळंबी मिळत होती. त्याला किलोला दरही १८० रुपये मिळत होता. त्यामुळे मच्छीमारांमध्ये समाधान होते. परंतू निसर्गाच्या धक्याने मच्छीमार नाराज झाले आहेत.
दापोलीत मासेमारी सुरळीत
दापोलीसह आजुबाजूच्या परिसरातील मच्छीमारांच्या जाळ्यात सध्या रेबन फिश, कोळंबी, पापलेट, बांगडा अशी वेगवेगळ्या प्रकारची मासळी मिळत आहे. त्याचा फायदा त्यांना मिळत आहे. त्या पट्ट्यात वाऱ्याचा जोर कमी असल्यामुळे निर्धोक मासेमारी सुरू आहे. त्या परिसरात परजिल्ह्यातील मच्छीमारांचे संकट दरवर्षी कायम असते. मुंबईतील मच्छीमार तिकडे मासेमारीसाठी येत असतात.