मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांचे आवाहन
रत्नागिरी:- स्वच्छ भारत मिशन ग्रामीण व शहरी यांच्या संयुक्त विद्यमानाने महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस (SBD) म्हणून साजरा केला जातो. यंदा १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता पंधरवडा साजरा केला जाणार आहे. हा पंधरवडा जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी प्रभावीपणे राबवावा, असे आवाहन, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले आहे.
या वर्षीच्या ‘स्वच्छता ही सेवा २०२४’ साठी स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता ही थीम निश्चित केली आहे. या अभियानात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत दैनंदिन उपक्रम राबविण्याचे शासनाकडून सूचित केले आहे. १७ सप्टेंबरला स्वच्छता ही सेवा मोहिमेचा शुभारंभ, १८ सप्टेंबरला ‘सफाई मित्र सुरक्षा शिबीर’ या उपक्रमाद्वारे सफाई मित्रासाठी एक खिडकी योजनेद्वारे सर्व योजनांच्या अनुषंगाने पात्र लाभार्थ्यांसाठी तालुकास्तरावर विशेष शिबीर आयोजित करावे. यात गृह निर्माण (PMAY), घरगुती टॅब कनेक्शन, अमृत, JJM, वैयक्तिक शौचालय पंतप्रधान जनधन योजना, LPG SBM, वीज पीएम सौभाग्य, बँकिंग- उज्वला गॅस योजना, आरोग्य विभाग PM- JAY आयुष्यमान भारत, लसीकरण मिशन इंद्रधनुष्य, क्रेडिट ॲक्सेस बँक, वित्त पुरवठा लिंकेज, विमा PM सुरक्षा विमा योजना, PM जीवन गती विमा योजना यांचा समावेश आहे.
दि. १९ सप्टेंबरला एक दिवस श्रमदानासाठी, २० सप्टेंबरला खाऊ गल्लीमध्ये स्वच्छतेच्या अनुषंगाने मोहिम राबविणे, स्वयंस्फूर्तीने लोकसहभागाच्या माध्यमातून शास्त्रयुक्त पध्दतीने कचऱ्याची विल्हेवाट लावणे, २१सप्टेंबरला सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, २२ सप्टेंबरला एकल प्लास्टिक न वापरण्याबाबत जनजागृती करणे, २३ सप्टेंबर रोजी गृहभेटीद्वारे जनजागृती करून, एक झाड आईच्या नावे उपक्रम राबवण्यात येणार आहे.
दि. २४ सप्टेंबर रोजी तालुकास्तरावर खासदार व आमदार, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच सर्व विभागांचे शासकीय कर्मचारी, महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्या उपस्थितीत स्वच्छता ज्योत रॅलीचे आयोजन, २५ सप्टेंबरला टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करणे, शाळा व महाविद्यालयामध्ये स्पर्धा कचरा वर्गीकरण चर्चा, कविता स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, पेंटिंग स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, प्रश्नमंजुषा आदींचे आयोजन, २६ सप्टेंबरला सार्वजनिक शौचालयाची साफसफाई व दुरूस्ती, २७ सप्टेंबरला साफसफाई करणे, २८ सप्टेंबर रोजी वैयक्तिक स्तरावर कंपोस्ट खत खड्डा शोष खड्डा निर्मिती करणे, २९ सप्टेंबर रोजी स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत निर्मिती करण्यात आलेल्या प्रकल्पांचे उद्घाटन, ३० सप्टेंबर रोजी स्वच्छतेचे वाहने व उपकरणे यांची स्वच्छता व सुशोभिकरण करणे, १ ऑक्टोबर रोजी स्वच्छता प्रतिज्ञा, सेल्फी पॉइंट आणि २ ऑक्टोबर रोजी स्वच्छता भारत दिन साजरा करणे, स्वच्छ माझे अंगण उपक्रम राबवण्यात येणार आहेत.
हे उपक्रम जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी प्रभावीपणे राबवावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले आहे.”