सात महिन्यात चोरी झालेले 57 पैकी 40 मोबाईल मूळ मालकांना परत

रत्नागिरी पोलिसांची दमदार कामगिरी

रत्नागिरी:- जिल्ह्यात होणाऱ्या मोबाईल चोरीचा छडा लावण्यात जिल्हा पोलिसांना यश आले आहे. जानेवारी 2023 ते जूलै 2023 अखेर सर्व पोलीस ठाणे हद्दीमधून नागरिकांचे हरवलेले 40 मोबाईल पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या हस्ते मुळ मालकांना परत देण्यात आले.

या सहा महिन्यांमधील मोबाईल चोरीची माहिती सायबर पोलीस ठाणे व तांत्रिक विश्लेषण शाखा, रत्नागिरी यांच्या मार्फत एकत्रित करण्यात आली तसेच प्राप्त माहितीच्या आधारे जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांच्या अंमलदारांच्या मदतीने वेळोवेळी शोध घेऊन एकूण 57 मोबाईल चा शोध घेण्यात व ते पुनर्प्राप्त करण्यात रत्नागिरी पोलीसांना यश आले आहे.

मंगळवार 22 ऑगस्ट रोजी यातील 40 मोबाईल मुळ मालकांना देण्यात आले असून उर्वरित मूळ मालकांना त्यांचे मोबाईल, सायबर पोलीस ठाणे येथून ताब्यात घेण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.
प्रसंगी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी गहाळ मोबाईल परत मिळवून देण्यात मोलाची कामगिरी करणार्‍या पोलीस अंमलदारांचे प्रशस्त पत्रक देऊन गौरव केला.

या कार्यक्रम सोहळ्यात पोलीस उपअधीक्षक मुख्यालय निलेश माईनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विनीत चौधरी, पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर, पोलीस निरी्क्षक शैलेश सणस, पोलीस निरीक्षक शैलजा बोबडे, राखीव पोलीस निरीक्षक रमेश निकम, सहा. पोलीस निरीक्षक वैशाली आडकूर व पोलीस अंमलदार असे उपस्थितीत होते.
या कार्यक्रमा दरम्याने पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी व अपर पेालीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी सायबर गुन्ह्यांना बळी पडू नये या करिता मोबाईल वापरताना जनतेने घ्यावयाची दक्षता याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

आपले गहाळ मोबाईल परत मिळवून दिल्याबद्दल उपस्थित 40 मोबाईल मालकांनी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी तसेच रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाचे आभार व्यक्त केले. हरवलेल्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण व शोध घेण्याकामी प्रभारी अधिकारी सायबर पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक स्मिता सुतार, सहा. पोलीस निरीक्षक नितीन पुरळकर, पोलिस नाईक रमिज शेख,पोलिस शिपाई निलेश शेलार व अजिंक्य ढमढेरे यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे.