सागरी महामार्गासाठी काळबादेवीत सीमांकन दाखवण्याची प्रक्रिया पूर्ण

लवकरच भूसंपादन होऊन पुलांच्या कामाला सुरुवात

रत्नागिरी:- समुद्री महामार्गादरम्यान रत्नागिरी समुद्रकिनारी होणाऱ्या पुलांसाठी भूसंपादन प्रक्रियेपूर्वी ग्रामस्थांना सीमांकन दाखवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर जयगड परिसरातील मोजणी पूर्ण होवून लवकरच जागेचे मूल्यांकन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येणार आहे. भूसंपादन प्रक्रियेनंतर लवकरच या पुलांच्या कामालाही सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आले.

समुद्री महामार्गादरम्यान तालुक्यातील काळबादेवी ते मिऱ्या आणि जयगड ते गुहागर तालुक्यातील तवसाळ हे दोन खाडी पूल उभारण्यात येणार आहेत. या पुलांसाठी आवश्यक जोडरस्त्यांसाठी भूसंपादन प्रक्रिया करण्यात येणार आहे. भूसंपादन करण्यापूर्वी संबंधित जमिनी नक्की कुठे आहेत व रस्ता नक्की कोणत्या जमिनीतून जाणार, या संदर्भात ग्रामस्थांना सीमांकन दाखवण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. काळबादेवी परिसरात या पुलासंदर्भात ग्रामस्थांचे दुमत होते. मात्र पालकमंत्री व जिल्हा प्रशासनाच्या सततच्या प्रयत्नांनतर आता जागेचे सीमांकन दाखवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लवकरच या परिसराची मोजणी प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

जयगड ते तवसाळ खाडी पुलांसाठी असणाऱ्या जयगड परिसरातील जोडरस्त्याची मोजणी पूर्ण करण्यात आली आहे. या जोडरस्त्यासाठी सांडलावगण येथील ६७ गण व चाफेरी गावातील ४ गणांची मोजणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता या जमिनींचे मूल्यांकन लवकरच करण्यात येणार असून त्यानंतर भूसंपादनाची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. कोकणातून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्ग, मिऱ्या-नागपूर महामार्गासोबतच आता समुद्री महामार्गाच्या कामालाही वेग आला आहे. या महामार्गामुळे कोकणातील समुद्राच्या कडेला असेलेली सर्व गावे जोडली जाणार आहेत. कोकणातील पर्यटन व्यवसायाला या महामार्गामुळे नवीन उभारी मिळणार असल्याचे सांगण्यात आले. या समुद्री महामार्गामुळे कोकणाला अन्य विभागांशी जोडणे व उद्योग व्यवसाय तसेच पर्यटनास चालना देणे शक्य होणार आहे. महामार्गासाठी आवश्यक पुलांसाठी राज्य शासनाने निधी मंजूर केल्यानंतर पुलांच्या कामासाठी जमिनीचे भूसंपादन करण्याची प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे.

रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीनही जिल्ह्यातून जाणाऱ्या या समुद्री महामार्गादरम्यान तब्बल ९ पूल उभारण्यात येणार आहेत. हे पूल काही ठिकाणी खाडीपात्रात तर काही ठिकाणी समुद्रात उभारण्यात येणार आहेत. या पुलांसाठी राज्य शासनाने तब्बल ९ हजार १०५ पूर्णांक ५२ कोटींच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे. लवकरच या पुलांचे काम वेगाने सुरु होणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.