साखर वाहतूक करणार्‍या ट्रकची चार वाहनांना धडक

एकाचा मृत्यू; सहा जण जखमी

रत्नागिरी:- तालुक्यातील हातखंबा बाजारपेठेत ट्रकने कार आणि तीन दुचाकी अशा चार वाहनांना धडक देत अपघात केल्याची घटना रविवारी दुपारी 12.30 वा. घडली. यात 6 जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे.जखमींना  जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान ट्रक चालकाला हातखंबा शाळेजवळ स्थानिकांनी पकडून ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले.

अजीउल्ला असमोहम्मद (37,रा.उत्तरप्रदेश) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित ट्रक चालकाचे नाव आहे. तर या अपघातात सतीश डांगरे (45) यांचा मृत्यू झाला असून सोमनाथ डांगरे(40),शुभांगी डांगरे(38) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.तर जयश्री डांगरे (38),ॠतुजा डांगरे(15),अर्पिता डांगरे(16,सर्व रा.गणेशनगर इचलकरंजी,जि.कोल्हापूर) आणि बाळकृष्ण पटवर्धन (72,रा.कासारवेली,रत्नागिरी) हे चारजण किरकोळ जखमी झाले आहेत.

रविवारी अजीउल्ला आपल्या ताब्यातील ट्रक (एमएच-08-डब्ल्यु-3945) मधुन साखर घेउन कोल्हापूर ते रत्नागिरी असा भरधाव वेगाने येत होता.तो हातखंबा बाजारपेठेत आला असता त्याचा ट्रकवरील ताबा सूटला आणि त्याने समोरील झेन गाडी(एमएच-01-एई-334) व दुचाकी (एमएच-09- डीसी-7392), (एमएच-09-ईई-2697) आणि (एमएच-09-एफजी-5843) या तीन दुचाकींना पाठीमागून धडक देत अपघात केला.