सलग दुसऱ्या दिवशी महामार्गावरील 75 बांधकामे हटवली

रत्नागिरी:- मिर्‍या-नागपूर महामार्गावरील कुवारबाव, टीआरपी येथील अनधिकृत बांधकामांवर बडगा उगारल्यानंतर दुसर्‍या दिवशी प्रशासनाने जे के फाईल्स ते साळवीस्टॉप येथील सुमारे 75 बांधकामे हटवली. दोन दिवसात 140 अनधिकृत बांधकामे राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि तहसील कार्यालयाने जमिनदोस्त केली आहेत. खासगी जागेतील काही दुकानदारांनी पत्रे टाकून वाढवलेल्या शेडवरही प्रशासनाने कारवाई केली.

राष्ट्रीय महामार्गाशेजारील अनधिकृत बांधकामे हटवण्याची मोहिम सलग दुसर्‍या दिवशीही कायम होती. पहिल्या दिवशी 65 बांधकामे हटवण्यात आली होती. कुवारबाव येथील सिंचन भवनापेक्षा टिआरपी परिसरात पत्र्याच्या शेडसह पक्की बांधकामे करुन दुकाने चालवणारे अनेक व्यावसायिक होते. काहीनी चौथरेही उभारलेले होते. ते सर्व चौथरे जेसीबीच्या सहाय्याने तोडण्यात आले. पत्रे, लोखंडी अँन्गलचे नुकसान नको म्हणून स्वत:हून काही व्यावसायिकांनी बांधकामे हटवली. त्यामुळे प्रशासनाचा वेळ वाचला. शनिवारी (ता. 13) जे.के. फाईल्स ते साळवीस्टॉप पर्यंतची बांधकामे हटवण्यास सकाळी 10 वाजता सुरुवात झाली. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, तहसीलदार कार्यालयातील अधिकारी, रत्नागिरी शहर आणि ग्रामीणचे पोलीस व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

साळवी स्टॉप येथे कंपनीच्या संरक्षक भिंतीला लागुन रंगबिरंगी झाडे, मडकी, कुंड्या, हेल्मेट विक्रेत्यांसह फळवाले गेले काही वर्षापासून वास्तव्य करत होते. काहींनी तर दुकानाच्या मागे पडदे टाकून कुटूंबांसह निवास व्यवस्थाच केली होती. साळवी स्टॉप येथे खासगी रुग्णालयासमोरील फळवाले, फुलवाले, वडापावच्या गाड्यांच्या माध्यमातून रोजगार मिळवणारी अनेक स्थानिक नागरिकांनाही याचा फटका बसला. तेथील सर्वच बांधकामे हटविण्यात आली आहेत. दिवसभरात पंच्याहत्तर बांधकामे हटवण्यात आली. ही कारवाई पुढे चर्मालयपर्यंत सुरु ठेवण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे. रस्त्याच्या मध्यबाजूपासून 15 मिटर दोन्ही बाजूला मार्ग मोकळा राहील याची खात्री प्रशासनाकडून घेण्यात आली. या कारवाईचे व्हीडीओ शुटींगही करण्यात आले आहे.