रत्नागिरी:- उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर पर्यटन हंगामही संपूष्टात आला होता. त्यामुळे पर्यटनस्थळंही सुनीसुनी होती. अधूनमधून शनिवार, रविवारी पर्यटकांची पावले वळत होती, परंतु तितकीशी गर्दी नव्हती. १५ ऑगस्टला रविवारची सुट्टी जोडून आल्यामुळे कोकणातील पर्यटन स्थळांवर पर्यटकांचा राबता वाढलेला होता. गणपतीपुळे पर्यटन स्थळांवर सोमवारी दिवसभरात दहा ते बारा हजार पर्यटकांनी हजेरी लावली होती. सुट्टीलाच संकष्टी चतुर्थी असल्यामुळे दर्शनासाठी आलेल्या भक्तांची गर्दी अधिक होती.
गेली दोन वर्षे कोरोनाने सर्वच व्यावसायांना मोठा फटका बसलेला होता. त्यानंतर गतवर्षी दिवाळी, यंदाचा मे महिना हे हंगाम पर्यटन व्यावसायिकांसाठी समाधानकारक गेले होते. जुन महिन्यात शैक्षणिक सत्र सुुरु झाल्यामुळे सुट्ट्याही संपल्या होत्या. १५ ऑगस्टच्या आदल्या दिवशी जोडून रविवार असल्यामुळे शासकीय सुट्टीचा फायदा पर्यटकांना मिळाला. अनेकांनी फिरण्यासाठी किनारी भागातील पर्यटन स्थळांची निवड केली होती. पर्यटकांचा राबता महाबळेश्वर पाठोपाठच रत्नागिरीतील प्रसिध्द गणपतीपुळे किनार्यावर अधिक होता. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची निवासस्थानांमध्येही पर्यटकांची गर्दी होती. मुंबई, पुण्यातील लोकांचा राबता अधिक होता. जुन महिन्यानंतर पर्यटकांची गर्दी कमी झाल्यामुळे व्यावसायिकांची निराशा झाली होत. सोमवारी पर्यटक वाढल्यामुळे किनार्यावरील उंट, घोडे यांच्यासह वाळूमध्ये चालवल्या जाणार्या गाड्या चालक यांचा फायदा झाला. नारळ विक्रेत्यांसह अन्य फेरीवालेही पर्यटकांच्या गर्दीमुळे समाधानी होते. गणपतीपुळेत चारचाकी वाहनांची रेलचेल होती.