सत्ताधारी माझ्या कुटुंबाला वेठीस धरत आहेत: आ. राजन साळवी

रत्नागिरी:- उबाठाचे आमदार राजन साळवी यांच्यासह पत्नी व मुलावर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता आ. साळवी यांना मोठे बंधू दीपक साळवी यांच्यासह तपास कामासाठी सोमवार 22 रोजी हजर राहण्याची नोटीस लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक सुशांत चव्हाण यांनी बजावली आहे. दरम्यान, आपण मोठ्या बंधुंसोबत चौकशीला जाणार असल्याचे आ. राजन साळवी यांनी पत्रकार परिषदेत सांगतानाच, सत्ताधारी माझ्या कुटुंबाला वेठीस धरत असल्याचा आरोप केला. न्याय देवता आपल्याला योग्य न्याय देईल असेही त्यांनी सांगितले.

गुरुवारी दिवसभर ठाणे, अलिबाग येथून आलेल्या अधिकार्‍यांनी रत्नागिरीतील लाचलुचपत विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांसह आमदार राजन साळवी यांच्या घरी व अन्य ठिकाणी छापेमारी करीत चौकशी केली होती. याप्रकरणात अपसंपदा गोळा केल्याप्रकरणी आ. राजन साळवी, सौ. अनुजा साळवी व शुभम साळवी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याघटनेनंतर शुक्रवारी लाचलुचपत विभागाने नोटीस पाठवून सोमवारी 22 जानेवारी रोजी दुपारी 12 वा. मोठे बंधू दीपक प्रभाकर साळवी यांच्यासह चौकशीला हजर राहण्याची नोटीस आ. राजन साळवी यांना बजावली आहे.

ही नोटीस आल्यानंतर शुक्रवारी दुपारी आ. राजन साळवी यांनी पत्रकार परिषदेत घेत सत्ताधार्‍यांवर आरोप केले व आपली भूमिका मांडली. लाचलुचपतच्या पथकाने जवळपास 10 तास गुरुवारी घराची झडती घेतली. यावेळी अटकेसंदर्भात वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊ असे अधिकार्‍यांनी सांगितले. गेले वर्षभर आपली, भावाची, कुटुंबियांसह पीए, ठेकेदार अशी तब्बल 70 जणांची चौकशी केली. अगदी खालच्या पातळीवर जाऊन मतदार संघात काम करणार्‍या ठेकेदारांना प्रश्न विचारण्यात आल्याचे आ. साळवी यांनी सांगितले. माझ्या छोट्यामोठ्या बंधूंची, पुतण्याची, वहिनीची चौकशी करण्यात आली. सहावेळा अलिबागला बोलावण्यात आले तरी अद्याप चौकशी संपलेली नसल्याचे आ. साळवी यांनी सांगितले.
आपण घर बांधले त्यासाठी 25 लाखाचे कर्ज घेतले, हॉटेल बांधले त्यासाठी 15 लाखाचे कर्ज घेतले, अगदी कार्यालयाच्या उभारणीसाठीही कर्ज घेतले आहे. परंतु त्याची कुठेच नोंद लाचलुचपत विभागाने केल्याचे दिसत नाही. आतापर्यंत शंभर टक्के माहिती आपण या अधिकार्‍यांना दिलेली असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्याला न्याय देवतेवर विश्वास असून, न्यायालयात योग्य न्याय मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आपल्यावर आलेल्या संकटात माझे कुटूंब माझ्या पाठीशी ठामपणे उभे आहे. रत्नागिरीसह लांजा-राजापूर मतदार संघातील जनता ही सर्व घटना पाहत असून, त्यांनी प्रत्यक्ष भेटून, फोनद्वारे आपल्याकडे भावना व्यक्त केल्या आहेत. जनतेचे पाठबळ असल्याने कोणी कितीही आपल्यावर दबाव आणला तरी आपण उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची साथ सोडणार नाही अशी स्पष्ट भूमिकाच आ. राजन साळवी यांनी व्यक्त केली.