शीळ धरणातून शुक्रवारपासून पाणी उपसा; शनिवारपासून शहराचा पाणी पुरवठा पूर्ववत

जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांची पाहणी : कामकाज युध्दपातळीवर

रत्नागिरी:- रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा पूर्ववत करण्यासाठी नगर पालिकेचे अधिकारी, तीन अभियंते 25 ते 30 कामगार युध्दपातळीवर काम करत आहेत. जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह आणि पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी या कामाची पाहणी करुन आढावा घेतला. बुधवारी आणखी 50 कर्मचारी यासाठी येणार आहेत. शुक्रवार पासून शीळ धरणातून पाणी उपसा करण्याचे नियोजन असून शहराचा पाणी पुरवठा शनिवारपर्यत पूर्ववत होणार आहे.

शीळ घरणाजवळील जॅकवेळ कोसळल्यानंतर नगरपालिकेने पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी युध्दपातळीवर काम हाती घेतले आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी याबाबत माहिती घेवून, दिलेल्या सुचनेनुसार जिल्हाधिकारी श्री.सिंह आणि पोलीस अधीक्षक श्री.कुलकर्णी यांनी प्रत्यक्ष कामकाज स्थळी भेट देवून आढावा घेतला. यावेळी प्रांताधिकारी जीवन देसाई, मुख्याधिकारी तुषार बाबर उपस्थित होते. मुख्याधिकारी श्री.बाबर यांनी सुरु असलेल्या कामकाजाबाबत माहिती दिली. शहरवासियांचा पाणी पुरवठा पूर्ववत करण्यासाठी पावसात देखील अधिकारी- कर्मचारी मेहनत घेत आहेत. त्यामुळे शनिवारपर्यंत पाणी पुरवठा पूर्ववत होणार आहे.