दापोली-केळशी मार्गावरील दुर्घटना; 25 प्रवासी जखमी
रत्नागिरी:- शिमगोत्सव साजरा करून पुन्हा परतीच्या मार्गावर असलेल्या चाकरमान्यांच्या एसटी बसला सकाळी आठच्या सुमारास अपघात झाला. जिल्ह्यातील दापोली केळशी येथे उटंबर – मुंबई गाडीला अपघात झाला. या एसटी बसमधील सुमारे 25 प्रवासी जखमी झाले आहेत. या सर्व जखमींवर केळशी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपचार सुरू आहेत.
समोरून येणाऱ्या वाहनाला वाचवण्यासाठी बस रस्त्याच्या खाली घेतल्याचे वाहन चालकाचे म्हणणे आहे. परंतू सदर वाहन चालकाने बेदरकारपणे वाहन चालवल्यामुळे हा अपघात झाला असल्याचा आरोप लोकांनी केला आहे. तसेच अपघात झाल्याने ही बस केळशी येथे उभी करून ठेवण्यात आली आहे. त्यामुळे जखमी प्रवासी व अन्य प्रवासी यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.
मुंबईकडे जायला निघालेल्या प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला आहे. चालकाच्या बेजबाबदारपणामुळे अपघात झाला असल्याचा आरोप केला जात आहे. केळशी गावानजीक ही बस रस्त्याच्या खाली गेली. प्रवाश्यांनी आरडाओरडा केल्यामुळे केळशी गावातल्या लोकांनी धाव घेतली आणि तात्काळ जखमींना केळशी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.