Saturday, May 16, 2026
spot_img
Home रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचा पुन्हा दणका

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचा पुन्हा दणका

रत्नागिरी:- रत्नागिरीसह महाराष्ट्रातील एकूण ३० शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व त्यांच्या एमबीबीएसच्या जागांवर राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडून (एनएमसी) टांगती तलवार आहे. या महाविद्यालयांमध्ये अनेक महत्वपूर्ण त्रुटी आढळल्याने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ एमबीबीएसच्या जागांच्या वार्षिक नूतनीकरणावरे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एनएमसीने या गंभीर बाबीची दखल घेत बुधवारी सुनावणी ठेवली होती. येत्या ४ दिवसात याबाबतचा अंतिम निर्णय होणार आहे.

एनएमसीच्या पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षण मंडळाने राज्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे मूल्यांकन केले होते. हे मूल्यांकन महाविद्यालयांनी सादर केलेले स्व-प्रमाणित घोषणापत्र, आधार-सक्षम बायोमेटिक उपस्थिती प्रणालीतील प्राध्यापकांची उपस्थिती, क्लिनिकल मापदंड व पायाभूत सुविधा यावर आधारित होते. मात्र, ३० पैकी अनेक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विविध मापदंडांवर गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत.

महत्वाचे म्हणजे, निदर्शनास आणलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी संस्थांकडून कोणतेही प्रयत्न झाले नसल्याचे निरीक्षणही एनएमसीने नोंदवले आहे. तसे पत्र १३ जून रोजी सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना पाठवण्यात आले आहे. त्यामध्ये रत्नागिरी वैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश आहे.

प्रत्येक महाविद्यालयाचे सखोल मूल्यांकन केल्यानंतर एनएमसीला आढळलेल्या त्रुटींबाबत शो कॉज नोटीस देण्यात आल्या होत्या. या नोटीसला संबंधित संस्थांनी सादर केलेले अनुपालन अहवाल तपासकांनी तपासले. मात्र, तपासकांना ते समाधानकारक आणि पटण्यासारखे आढळले नसल्याचे पत्रात नमूद आहे.