शाळा गजबजल्या पण शाळा दुरुस्त्यांचे काय?

206 पैकी 130 कामे पूर्ण; 45 कामे प्रगतीत तर 31 शाळांचा अजूनही दुरूस्ती प्रतिक्षा

रत्नागिरी:- नव्या शैक्षणिक वर्षापूर्वी पालकमंत्री उदय सामंत यांनी लक्ष घालून जिल्हा नियोजनमधून सन 2024-25 या वर्षात शाळा दुरुस्तीसाठी 3 कोटी 63 लाख रुपये मंजूर केले होते. आता तर या शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झालेला असताना जिल्हा वार्षिक योजनेतून प्राथमिक शाळांची विशेष दुरूस्ती अंतर्गंत कार्यारंभ आदेश दिलेल्या 206 शाळांच्या कामांपैकी 130 कामे पूर्ण झालीत. त्यातील अजूनही 45 शाळांची कामे प्रगतीत तर 31 शाळांची कामे सुरू होण्याची प्रतिक्षा राहिली आहे.

जिल्हा परिषदाया प्राथमिक शाळा आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत काही शाळा डिजिटल झाल्या असल्या तरी काही शाळांच्या दुरुस्तीचा प्रश्न उभा आहे. मागील काही महिन्यांपूर्वी केलेल्या सर्वेक्षणानुसार रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील 211 प्राथमिक शाळांच्ग्या दुरूस्तीची कामे जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 मध्ये मंजूर झाली होती. त्या कामांना प्रशासकीय मान्यताही देण्यात आलेली होती. प्राथमिक शाळांच्या इमारती नादुरूस्त बनल्याने नव्या शैक्षणिक वर्षात शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्या शाळांच्या दुरुस्तीची कार्यवाही सुरू करण्यात आली. त्या धोकादायक शाळांची दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीकडून सुमारे साडेतीन कोटी मंजूर करण्यात आलेले होते.

नव्या शैक्षणिक वर्षापूर्वा त्या शाळांची दुरुस्ती करण्यात येणार असल्यो सांगण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांमध्ये गरीब तसेच सर्वसामान्यांची मुले शिक्षण घेतात. शाळांची गुणवत्ता सुधारावी, यासाठी शिक्षण विभागातर्फे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्याचा चांगला परिणामही अलीकडच्या काळात दिसत आहे. मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यावर भर असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. तर दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या त्या शाळांच्या इमारती नादुरुस्त झालेल्या असताना त्यांच्या दुरूस्तीची कार्यवाही अजूनही रखडलेली समोर येत आहे.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून शासनाकडे प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीसाठी वेळोवेळी निधीची मागणी करण्यात आलेली आहे. याबाबत पालकमंत्री उदय सामंत यांनी लक्ष घालून जिल्हा नियोजनमधून निधी देखील उपलब्ध करून दिलेला होता. कार्यारंभ आदेश दिलेल्या जिल्ह्यातील एकूण 206 शाळांपैकी 130 प्राथमिक शाळांची कामे पूर्ण झालेली आहेत. तर 45 शाळांची कामे प्रगतीत आणि 31 शाळांची कामे अजून सुरु झालेली नसल्याची बाब समोर येत आहे.