रत्नागिरी:- गेल्या सव्वा महिन्याच्या सुट्टीतील मौजमजेनंतर नव्या शैक्षणिक 2025-26 या वर्षाचा सोमवारपासून प्रारंभ झाला. आनंद… उत्साह… हुरहुर अशा या प्रवेशोत्सवात विद्यार्थ्यांचा किलबिलाटाने जिल्ह्यातील सर्व विद्यामंदिरे जणू पुन्हा नव्या शैक्षणिक सत्राने गजबजून गेली आहेत. आकर्षक सजावट, ढोल-ताशांच्या गजरात, कुठे चारचाकी, घोडागाडी अशा मोठ्या डामडौलात, उत्साही वातावरणात यादिवशी जिल्हयात 10 हजार 121 नवागतांचे पहिलीच्या वर्गात स्वागत करण्यात आले.
16 जूनपासून शैक्षणिक सत्राला प्रारंभ झाला आहे. त्यासाठी शाळेच्या पहिल्याच दिवशी नवागतांच्या स्वागतासाठी सर्व शाळांची स्वच्छता, साफसफाईची कामे अगोदरच उरकून घेण्यात आलेली होती. शाळा प्रवेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी प्रत्येक शाळेतील वातावरणही आनंदमयी करण्यात आले होते. मुलांच्या स्वागतासाठी शाळांच्या दरवाजाची आकर्षक फुले, फुगे, यांनी सजविलेल्या कमानींची सजावट करून नवागतांचे व त्यांच्यासोबत आलेल्या पालकांचेही गुलाबपुष्प, वृक्षरोप देऊन स्वागत करण्यात येत होते.
शहरासह, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करून घेण्यासाठी त्यांची वाजत-गाजत मिरवणूकही काढण्यात आल्या. शहरातील शाळांमध्ये त्यांच्या मुख्य गेटवर विद्यार्थी येताच स्वागत केले जात होते. पण ग्रामीण भागात हे चित्र काहीसे वेगळे होते. तेथील ग्रामस्थांच्या सहकार्याने शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी ढोल-ताशांच्या गजरात मिवरणूकाही काढल्या. विद्यार्थ्यांना आणण्यासाठी चारचाकी गाड्या सजवून, बैलगाडी सजवून, तर कुठे घोडागाडी सजवून त्यातून विद्यार्थी आणण्यात आले. स्वागत दिंडीत मुलांबरोबर शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, गावातील पदाधिकारी, पालक, ग्रामस्थ, यांनाही सहभागी करून घेण्यात आले होते.
पहिल्या दिवशी नवे दप्तर, नवी पुस्तके, साहित्य, अशा वातावरणात विद्यार्थ्याचा अनोखा साज होता. त्यावेळी अनेक मुलांचे पालकही सोबत शाळांमध्ये आलेले होते. विद्यार्थ्यांबरोबर पालकांचीही शाळांमध्ये यादिवशी गर्दी झालेली होती. अशा या शाळा प्रवेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यात इ. 1 ली ते 8 वीत शिकणार्या 1 लाख 279 लाभार्थी विद्यार्थ्यांना 6 लाख 12,166 पाठ्यपुस्तकांचे वितरण वितरण पहिल्या दिवशी करण्यात आले. तर मेफत गणवेश, बुट व दोने जोड पायमोजे 66,289 लाभार्थी विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात आले. शालेय पोषण आहार योजनेंतर्गंत गोड पदार्थाचे वाटप करण्यात आले. शाळेच्या पहिल्या दिवशी जि.प. प्रशासनातील सर्व खातेप्रमुखांनी शाळा प्रवेशोत्सवाला दिलेल्या शाळांमध्ये हजर राहून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. तसा गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, पंचायत समितीमधील सर्व खात्याचे अधिकारी, कर्मचारी, पर्यवेक्षीय अधिकारी यांचे शाळा प्रारंभदिनी शाळा भेटीसाठी जिल्हाभरातील ठिकठिकाणच्या शाळांमधुन उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत मुलांचे स्वागत करण्यात आले.