शहरवासीयांना दिवसातून दोन ऐवजी एकदाच पाणी

रत्नागिरी:-शहरवासीयांना आता दोन वेळ नाही तरी एकवेळच पाणीपुरवठा होणार आहे; मात्र दीड ते दोन तास मुबलक पाणी मिळणार आहे. पालिका प्रशासनाने घेतलेला हा निर्णय आहे. सुमारे ७२ कोटी रुपये खर्च करून सुधारित पाणीयोजना राबवण्यात आली. त्यामुळे शहरवासीयांना दोनवेळा मुबलक पाणी मिळेल, अशी अपेक्षा होती; मात्र दिवसातून एकवेळचे पाणी मिळत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सुरू आहे. त्यात कोणत्या भागात किती वाजता पाणी येईल, याचे वेळापत्रक निश्चित नसल्याने गैरसोयीत आणखी भर पडत आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या जलवाहिन्या पूर्ण जीर्ण झाल्या आहेत तर काही ठिकाणी त्या तुंबल्या आहेत. त्यामुळे पाणी वितरण व्यवस्थेचे तीनतेरा वाजायचे. शिळ धारणामध्ये मुबलत पाणी असूनही नागरिकांना ते मिळायचे नाही. वारंवार फुटणारी जलवाहिनी, गळतीचे प्रमाण ३० टक्केच्या वर अशा पालिकेच्या पाणीयोजनेची वाईट परिस्थिती होती. यात सुधारणा व्हावी, यासाठी गेली चार वर्षे शहरामध्ये सुधारित पाणीयोजना राबवली जात आहे. त्याचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही; मात्र अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात आहे. वाढीव दरामुळे ६३ कोटीची ही पाणीयोजना ७२ कोटीवर गेली. योजना पूर्ण झाल्यानंतर शहरवासीय़ांना वेळेत आणि मुबलक पाणी मिळेल, अशी अपेक्षा आहे; मात्र ती पूर्ण होताना दिसत नाही.

पाणी योजनेचे काम जवळजवळ पूर्ण होत आले आहे. शहराच्या खालच्या भागातील काही किरकोळ कामे शिल्लक आहेत. त्यामुळे नवीन योजनेद्वारा पाणी पुरवठा सुरू झाला आहे. शहरवासीय दररोज सकाळ आणि संध्याकाळी दोनवेळा पाणी येईल, या अपेक्षेने आहेत; मात्र त्यांची आता घोर निराशा होणार आहे. पालिका प्रशासनाने शहरामध्ये एका वेळेलाच पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहरातील वेगवेगळ्या भागात आता सकाळी किंवा संध्याकाळी असे एकदाच पाणी येणार आहे; मात्र ते दीड ते दोन तास मुबलक देण्याचा वादा प्रशासनाने केला आहे. पालिका प्रशासनाने त्या-त्या भागासाठी भागांसाठी पाणी सोडण्याची निश्चित वेळ ठरवण्याची नागरिकांची मागणी आहे.