शशिकांत वारिशे हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी 12 अधिकारी, कर्मचाऱ्यांची एसआयटी स्थापन

रत्नागिरी:- पत्रकार शशिकांत वारिशे हत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्याची घोषणा गृहमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर आता जिल्हा पोलीसांनी 12 अधिकारी, कर्मचाऱ्याची एसआयटी स्थापन केली असून त्यामार्फत हत्येचा तपास सुरु झाला आहे. पोलीसांनी तांत्रिक पुरावे गोळा करण्यावर अधिक भर दिला आहे.

राजापूर तालुक्यातील कोदवली येथील पेट्रोलपंपावर गाडीत पेट्रोल भरून निघालेले पत्रकार शशिकांत शंकर वारीशे (45 रा. कशेळी) यांच्या दुचाकीला एका थार कारने धडक दिली होती. या अपघातात गंभीररित्या जखमी झालेल्या शशिकांत वारिसे यांना उपचारासाठी रत्नागिरी शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती गंभीर असल्याने सोमवारी सायंकाळी उशीरा त्यांना कोल्हापूरच्या सीपीआर रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान मंगळवारी सकाळी शशिकांत वारिसे यांचे निधन झाले.

पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या अपघातानंतर हत्येचा संशय व्यक्त करण्यात आला होता. हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप नातेवाईकांणी केला होता. ज्याने धडक  दिली त्या संशयित पंढरीनाथ आंबेरकर यांनी खून करण्याच्या उद्देशानेच गाडी अंगावर घालून शशिकांत याला गाडीखाली घालून मारले असा आरोप करण्यात आला.

रिफायनरी विरोधक आणि रिफायनरी समर्थक असे दोन गट असल्याने राजापुरात वातावरण कमालीचे तंग झाले होते. त्यातच रिफायनरी विरोधकांनी शशिकांत वारिशे यांच्या हत्त्येचा विषय उचलून धरला. सुरूवातीला पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र वातावरण तापत गेल्यानंतर भादंविक 302 चा गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणात स्थानिक पातळीसह राज्य स्तरावर याचे पडसाद उमटले. विरोधकांनी तर हा विषय उचलून धरत यामागे नेमके  कोण आहे? याची चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. शिवसेना खासदार संजय राऊत, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, कॉंग्रेसचे नेते आमदार नाना पटोले, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आदींनी आपल्या प्रतिक्रीया व्यक्त केल्या होत्या. त्याच दरम्यान उपमुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांनी एसआयटीची घोषणा केली होती.
शशिकांत वारिशे खून प्रकरण हा विषय अवघड होत असतानाच पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी 12 जणांच्या एसआयटीची स्थापना केली आहे. त्यामध्ये डिवायएसपी, दोन पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि काही अंमलदारांचा समावेश करण्यात आला आहे.

शशिकांत वारिशे प्रकरणात सुरूवातीला अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर भादंविक 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. खुनाचा गुन्हा दाखल झाला असला तरी हा अपघात नसून खूनच आहे हे पटविणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. त्यासाठी काही तज्ञांची मदत पोलिसांनी तपासात घेतली आहे.

या खून प्रकरणात आता साक्षीदार, पंच घेण्यास सुरूवात केली आहे. त्याचबरोबर तांत्रिक पुरावे मिळवण्यासाठी पोलिसांनी पूर्ण प्रयत्न सुरू केले आहेत. मोबाईल सीडीआरसह परिसरातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार कोण आहे का? याची चाचपणीदेखील आता पोलिसांकडून केली जात आहे.