Tuesday, September 15, 2026
spot_img
Home राजकीय शब्द न पाळल्याबद्दल रमेश कीर यांची माफी मागतो: बाळ माने

शब्द न पाळल्याबद्दल रमेश कीर यांची माफी मागतो: बाळ माने

रत्नागिरी:- महाविकास आघाडीच्या माध्यमातून रत्नागिरी पालिकेच्या निवडणूका लढताना काँग्रेसला ३ जागा देण्याचा शब्द मी दिला होता. रमेश कीर, मिलिंद कीर म्हणतायत ते चुकीचे नाही. परंतु ज्या ३ प्रभागांमध्ये त्यांना या जागा सोडायच्या होत्या. त्या सोडल्या असत्या तर नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला त्याचा काहीच फायदा झाला नसता. तेथील राजकीय परिस्थिती पाहून आम्ही त्या जागा उबाठा शिवसेनेकडून लढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मी रमेश कीर यांची माफी मागतो. परंतु महाविकास आघाडीच्या मतांचे विभाजन करण्याचा हा प्रयत्न आहे, असे मत महाविकास आघाडीतील उबाठाचे उपनेते बाळ माने यांनी व्यक्त केली.
आम्ही रत्नागिरी शहराच्या विकासाचे व्हिजन घेऊन या निवडणुकीत उतरलो आहोत. नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. आम्हाला नक्की यश मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केली.

माजी खासदार विनायक राऊत यांच्या अभ्युदयनगर येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, प्रसाद सावंत, शिवानी माने आदी पदाधिकारी आणि २६ उमेदवार उपस्थित होते.

बाळ मान म्हणाले, महाविकास आघाडी ३२ नगरसेवक आणि १ नगराध्यक्षपदाची जागा लढवत आहे. यामध्ये उबाठा शिवसेनेला २६ जागा, राष्ट्रवादी कॉंग्रेसला ४, कॉंग्रेसला १ आणि बहुजन समाज पार्टीला १ अशा जागा सोडण्यात आल्या आहेत. २९ जागा वाटपांबाबद कोणतीही अडचण नाही. परंतु ३ जागांचा प्रश्न आहे. यामध्ये प्रभाग ३०,३१ आणि ३२ जागावाटपाचा प्रश्न आहे. या जागा कॉंग्रेस पक्षाला सोडण्याचा आमचा निर्णय झाला होता. तसा शब्द मी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रमेश कीर यांना दिला होता. परंतु प्रत्यक्ष तेथील राजकीय स्थिती पाहिली तर फार वेगळी होती. कॉंग्रेसला जागा सोडली असती तर उबाठाचे लोक तिथे तटस्त राहिले असते. गेल्या विधानसभा निवडणुकीत येथे मशाल चिन्हाला चांगले मतदान झाले आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला हे अडचणीचे ठरणार होते. त्यामुळे आम्ही शब्द देऊनही परिस्थिती लक्षात आल्यानंतर शिवसेनेच्या उमेदवारांची उमेदवारी मागे घेतली नाही. त्यामुळे मी रमेश कीर यांची माफी मागतो. याबाबत मी त्यांच्याशी फोनवरून बोलणार आहे, असे स्पष्ट केले. हे पेल्यातील वादळ आहे. याचा महाविकास आघाडीवर काही परिणाम होणार नाही. महाविकास आघाडीच्या मतांचे विभाजान करण्यासाठी घड्याळ पुढे आणण्याचा हा राजकीय डाव आहे, असे माने यांनी स्पष्ट केले.

भाजप, जनसंघ मदत करेल

भाजपमध्ये मी चाळीस वर्षे काढली, मी आजही जनसंघामध्ये आहे. परंतु ज्या पद्धतीने भाजपमध्ये इनकमिंग सुरू झाले तेव्हापासून माझ्यावर वारंवार अन्याय होत गेला. याला कंठाळून मी भाजपमधून बाहेर पडलो. परंतु आजही भाजप आणि जनसंघाच्या लोकाशी माझे चांगले संबंध आहे. मी रत्नागिरी शहर विकासासाठी शिवानी माने या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला मदत करा, अशी विनंती करणार आहे. मला मदत करतील याची खात्री आहे, असे बाळ माने म्हणाले.