वैभव खेडेकर, अविनाश सौंदळकर यांच्यासह चौघे मनसेतून बडतर्फ

पाचल:- कोकणातील राजकारणात मोठी खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार कोकणातील चार मनसे नेत्यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. यामध्ये दोन दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. बडतर्फ करण्यात आलेल्या नेत्यांमध्ये वैभव खेडेकर (खेड, रत्नागिरी), अविनाश सौंदळकर (राजापूर, रत्नागिरी), संतोष नलावडे (चिपळूण, रत्नागिरी) आणि सुबोध जाधव (माणगाव, रायगड) यांचा समावेश आहे.

पक्षाच्या नियम व धोरणांचे उल्लंघन तसेच पक्षविरोधी कार्य केल्याच्या कारणास्तव ही कारवाई करण्यात आल्याचे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
या निर्णयाची घोषणा मनसे नेते संदीप देशपांडे व अविनाश जाधव यांनी केली असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडेकर यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चेला उधाण आले होते. अखेर सोमवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिकृत पत्रकात त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. खेड शहरासह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात मनसेची ताकद उभी करण्यात वैभव खेडेकर यांचा सिंहाचा वाटा होता. त्यामुळे त्यांच्या बडतर्फीमुळे पक्षाला कोकणात मोठे राजकीय नुकसान सहन करावे लागणार असल्याचे बोलले जात आहे.

विशेष म्हणजे अविनाश जाधव आणि संदीप देशपांडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे वैभव खेडेकर यांच्या निलंबन पत्रावर चक्क अविनाश जाधव आणि संदीप देशपांडे यांची सही असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे