वेळ पडल्यास जे.के. फाईल कंपनीत खळ खट्याक; मनसेचा इशारा

रत्नागिरी:-आम्ही कामगारांच्या न्याय हक्कासाठी भेटलो. मात्र कंपनी प्रशासन फार मुजोरी दाखवत असेल तर खळ खट्याक कसे असते? हे रत्नागिरीतच नव्हे ठाण्यातदेखील त्याचा आवाज घुमेल, असा इशाराच महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सरचिटणीस गजानन राणे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.

रत्नागिरीतील जे.के. फाईल कंपनीमधील सुमारे 420 कंत्राटी कामगारांना तडकाफडकी नोकरीवरून काढून टाकल्याने आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. मनसेने कामगारांच्या बाजूने उभे राहत जोपर्यंत कामगारांना न्याय मिळत नाही तोपर्यंत कंपनी व्यवस्थापनाला स्वस्थ बसू देणार नाही, असा गर्भित इशाराच कामगार सेनेने दिला आहे. यावेळी मनसेचे रत्नागिरी जिल्हा संपर्क अधिकारी अमोल साळुंखे, मनसेचे विद्यार्थी सेनेचे तालुका अध्यक्ष गुरु चव्हाण, चैतन्य शेंडे यांच्यासह शेकडो उपस्थित होते. 

बोलतात एक करतात दुसरं!

जे.के. फाईल कंपनीतील काही कामगारांना ज्या समस्या भेडसावत होत्या त्याबाबत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मनसे कामगार सेनेने पुढाकार घेतला. कंपनी व्यवस्थापनाशी सकारात्मक चर्चा झाली. मात्र बैठकीत अधिकारी बोलले एक मात्र केलं दुसरंच, असा आरोपही राणे यांनी यावेळी केला. 

साधा युनिफॉर्म नाही

यावेळी बोलताना राणे पुढे म्हणाले की, या कर्मचार्‍यांनी दिवसरात्र काम केलं आहे. मात्र त्यांना वेळेवर पगार दिला जात नव्हता. हेवी कामगारांची ड्युटीदेखील त्यांना करावी लागत होती. कामगारांना शूज, हॅण्डग्लोव्हजसह सेफ्टीसाठी कोणतेच साहित्य दिले जात नव्हते. साधा युनिफॉर्म ठेकेदाराकडून दिला गेला नाही.

दबाव कोणाचा?

बैठक सकारात्मक झालेली असताना अचानक स्थानिक व्यवस्थापनावर कोणाचा दबाव आला? मनसे कामगार सेनेचा धसका नेमका कोणी घेतला? याचा शोध घेतला जाणार आहे. कोणाच्या दबावाने कामगारांना घरी बसवलं? याची पाळंमुळं खोदून काढणार असल्याचे गजानन राणे यांनी यावेळी सांगितले.

जिल्हाधिकार्‍यांची भेट

कामगारांवर अन्याय होऊ नये यासाठी सुरुवातीचे पाऊल आम्ही सनदशीर मार्गाने टाकले आहे. यासाठी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन त्यांना त्याबाबतचे निवेदन दिले आहे. 8 दिवसांत बैठक घेऊन यावर तोडगा काढू, असे आश्‍वासन जिल्हाधिकार्‍यांनी दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

…तर खळखट्याक

आम्ही कामगारांसाठी संयमाची भूमिका दाखवली आहे. याचा गैरफायदा कंपनी व्यवस्थापनाने घेऊ नये. रत्नागिरीत कंपनीबाहेर कामगारांचे आंदोलन होईल आणि तिकडे ठाण्यातील मुख्यालयात या आंदोलनाचे पडसाद उमटतील, असा इशाराच राणे यांनी दिला आहे.

400 कुटुंब उघड्यावर आलीत

आम्ही केवळ कामगारांच्या न्याय हक्कासाठी प्रयत्न करीत आहोत. आज 400 कुटुंबं उघड्यावर आली आहेत. स्थानिक तरुण उद्ध्वस्त होणार आहे. ही बाब लांच्छनास्पद असून कोणत्याही परिस्थितीत या कामगारांना न्याय मिळवून देणारच, असा इशाराच गजानन राणे यांनी दिला आहे.