वेगवान वाऱ्यासह पावसाचा इशारा; मच्छिमारांना अलर्ट जारी

रत्नागिरी:- पुढील 24 तासात तसेच  दिनांक 17 ऑक्टोबर 2020 रोजीपर्यंत किनारपट्टीवर 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार असल्याची माहिती प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांनी दिली असल्याने मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये. जिल्ह्यात गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तरी त्या अनुषंगाने योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे करण्यात आले आहे. 
 

दिनांक 14 ऑक्टोबर 2020 रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गडगडाटासह विजा चमकण्याची तसेच मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची तसेच तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. दिनांक 16 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर दिनांक 17 ऑक्टोबर 2020 रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तरी त्या अनुषंगाने नागरिकांनी योग्य ती खबदारी घ्यावी. विजा चमकत असताना संगणक, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्त्रोतांपासून अलग करून ठेवावीत. दूरध्वनी, भ्रमणध्वनीचा वापर टाळावा, विजा चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी अश्रय घ्यावा. विजेच्या खांबापासून लांब रहावे. विजा चमकत असताना उंच झाडाखाली अश्रयास थांबू नये, विजा चमकत असताना एखाद्या मोकळ्या परिसरात असल्यास, गुडघ्यामध्ये डोके घालून वाकून बसावे, धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात.