विद्यार्थ्यांचे हित आंतरजिल्हा बदलीतील अडथळा

जिल्हा परिषद; संपामुळे प्रस्ताव शिक्षण विभागाकडेच

रत्नागिरी:- आंतरजिल्हा बदल्या करताना विद्यार्थ्यांचे हित विचारात घेऊन शिक्षकांना कार्यमुक्त करा असे शासन निर्णयात नमुद केले आहे. त्याचा विचार रत्नागिरी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांमध्ये करण्यासाठी शिक्षण विभागाकडून हालचाली सुरु आहेत. यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी कोणता निर्णय घेणार यावर आंतरजिल्हा बदलीने जाणार्‍या सातशेहून अधिक शिक्षकांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

गेल्या बारा वर्षात प्राथमिक शिक्षकांची भरती प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. त्यामुळे रिक्त पदांची संख्या दरवर्षी वाढत आहे. जिल्ह्यात सध्या 1100 हून अधिक शिक्षकांची पदे रिक्त आहेत. ही परिस्थिती असताना आंतरजिल्हा बदलीने जाणार्‍या शिक्षकांची त्यामध्ये भर पडत आहे. यंदा 706 शिक्षक आंतरजिल्हा बदलीच्या यादीमध्ये आहेत. शासनाने यापुर्वी दहा टक्के पेक्षा अधिक पदे रिक्त असतील तेथे शिक्षकांना सोडू नये असे आदेश होते; परंतु सरकारने तो नियम शिथिल करुन दोन महिन्यापुर्वी नव्याने शासन निर्णय काढला आहे. त्यामध्ये आंतरजिल्हा बदलीसाठी पात्र ठरलेल्या शिक्षकांना 1 ते 30 एप्रिल 2023 या कालावधीत शिक्षकांच्या कार्यमुक्तीबाबत प्रशासकीय आदेश निर्गमित करावेत आणि कोणत्याही परिस्थितीत कार्यमुक्त करावे अशा सुचना आंतरजिल्हा बदलीसाठी शासनाने काढले आहेत.

शासनाचे आदेश आल्यानंतर प्राथमिक शिक्षण विभागाकडून तात्काळ कार्यवाहीला सुरवात केली आहे. परंतु शासकीय कर्मचार्‍यांचा संप सुरु झाल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे फाईल पाठविण्यात आलेली नव्हती. संप मागे घेतल्यामुळे पुढील दोन दिवसात यावर कार्यवाही होईल. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी आंतरजिल्हा बदलीने शिक्षक सोडण्याबाबतचा अंतिम निर्णय घेणार आहेत. या शासन निर्णयामध्ये

बदलीसाठी दिलेल्या आदेशात विद्यार्थ्यांचे हित विचारात घेऊन शिक्षकांना कार्यमुक्त करात असे नमुद केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सध्याची रिक्त पदे आणि शिक्षकांना सोडल्यानंतर होणारी रिक्त पदे यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणारा परिणाम याचा विचार अधिकारी करण्याची शक्यता आहे. शासन निर्णयातील तरतुदीमध्ये टप्प्याटप्प्याने सोडा असे नमुद केले असल्याने अधिकार्‍यांकडून त्याचा योग्य अर्थ घेतला तर एकाचवेळी बदल्या होणार नाहीत. प्रशासनही या तरतुदींचा विचार करुन सीईओंकडे प्रस्ताव पाठवणार असल्याची चर्चा सुरु आहे.