रत्नागिरी:- शालेय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी नाणीज येथील शिक्षक विजय शंकर इरमल याला पोस्को विशेष न्यायालयाने पाच वर्ष सक्तमजुरीसह ९ हजारांचा दंड ठोठावला आहे. जिल्ह्यात विशेष न्यायालय सुरु झाल्यानंतर ही पहिलीच शिक्षा न्यायमूर्ती व्ही. ए.राऊत यांनी ठोठावली आहे.
शिक्षा झालेला विजय इरमल हा नाणीज तेथील एका शाळेत शिक्षक म्हणून सेवेत होता.सन २०१८ मध्ये त्याने, मुख्याध्यापकांची खोली स्वच्छ करण्याच्या बहाण्याने आठवीतील विद्यार्थीनीला शाळा सुरू होण्यापूर्वी बोलाविले होते. यावेळी विद्यार्थिनी मुख्याध्यापकांची खोली साफ करताना शिक्षकाने तिचा विनयभंग केला. या घटनेची वारंवार पुनरावृत्ती झाल्याने घाबरलेल्या विद्यार्थीनीने शाळेत जाणे टाळले. यावेळी तत्कालीन मुख्याध्यापकांनी विद्यार्थिनी शाळेत का येत नाही ? याची विचारणा केल्यानंतर ही घटना उघड झाली होती.त्यानंतर विद्यार्थिनीच्या पालकांनी तक्रार लांजा पोलीस स्थानकात दाखल केली होती. त्या प्रकरणाची चौकशी करून दोषारोपपत्र पोलीस उपनिरीक्षक रेखा जाधव यांनी न्यायालयात दाखल केले.जिल्हा न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू होती. या कालावधीत पोस्को विशेष न्यायालय सुरू झाल्याने हा खटला न्यायालयात वर्ग करण्यात आला.खटल्याची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायमुर्ती व्हि.ए.राऊत यांनी आरोपी विजय इरमल याला भादंविक ३५४ (अ ), ३२३ नुसार प्रत्येकी १००० रुपये दंड , दंड न भरल्यास एक महिना साधी कैद , भादविक ५०६ नुसार २ हजार रुपये दंड , दंड न भरल्यास एक महिना साधी कैद, पोस्को कायदा कलम ९(फ) १०मध्ये ५ वर्षे सक्तमजुरी पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावली आहे.