वादळी वाऱ्याने जयगड बंदरात नांगरून ठेवलेली बोट बुडाली

रत्नागिरी:- वादळी वाऱ्यासह दाखल झालेल्या तोक्ते चक्रीवादळाने जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले. किनारपट्टी भागात वादळी वाऱ्यानी धुमाकूळ घातला. वादळी वाऱ्याच्या भीतीने अनेक मासेमारी नौकांनी जयगड बंदरांचा आधार घेतला होता. नांगरून ठेवलेली एक नौका वादळी वाऱ्यांमुळे बुडाली. याशिवाय अनेक नौकांचे नुकसान झाले आहे. 

रविवारपासून जिल्ह्याला तोक्ते चक्रीवादळाने झोडपून काढले. वादळी पावसाने अक्षरशः थैमान घातले असून या वादळाचा फटका मच्छिमारांना देखील बसला आहे. वादळाच्या इशाऱ्यानंतर सर्व बोटी किनाऱ्यावर परतल्या मात्र सोसाट्याच्या वाऱ्याने व खवळलेल्या समुद्राने किनाऱ्यावर नांगरून ठेवलेल्या अनेक बोटींचे देखील नुकसान झाले आहे.

रविवारी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे नौका बंदरात हेलकावे खात असल्याचे दिसून आले. अनेक नौका बंदरातच एकमेकांवर आदळल्या. रत्नागिरी तालुक्यातील जयगड बंदर येथे एका मच्छिमाराची नांगरून ठेवलेली बोट रविवारी रात्रीच्या सुमारास बुडाली आहे.