रत्नागिरी:- पावसाळी मासेमारी बंदीच्या 10 दिवस अगोदरच समुद्रातील मासेमारी पूर्णपणे बंद झाली आहे. 31 मे पासून पावसाळी मासेमारी बंदी कालावधी सुरू होणार होता. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यांमुळे समुद्र खवळण्याची शक्यता असल्याने 21 ते 24 मे पर्यंत मच्छीमारांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले. त्याचबरोबर 30 मे पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता असल्याने सर्व मच्छीमार नौका बंदरांमध्ये स्थिरावल्या आहेत. पर्ससीननेट नौका शाकारण्याचे काम 10 मे पासूनच सुरू झाले होते. आता या सर्वच नौका मिरकरवाडा बंदरात शाकारल्या गेल्या आहेत.
रत्नागिरी जिल्ह्याला 167 कि.मी.चा समुद्रकिनारा लाभला आहे. सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयाकडील सन 2024 नोंदीनुसार रत्नागिरी जिल्ह्यात 3 हजार 174 सागरी मासेमारी नौका आहेत. यातील 2 हजार 515 यांत्रिकी नौका आहेत. या सर्व नौका सतर्कतेच्या इशार्यामुळे मासेमारीसाठी समुद्रात जात नाहीत. अरबी समुद्रात 21 मे ते 24 मे पर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार होऊन समुद्र खवळण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर मच्छीमारांना सावधगिरी बाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
खोल समुद्रात मासेमारीसाठी जावू नये, लहान बोटींचा वापर टाळावा, सुरक्षेची आवश्यक साधणे जवळ बाळगावी, वार्याचा वेग आणि लाटांचा जोर लक्षात घेवून सर्व नौका आणि होड्या सुरक्षितस्थळी उभ्या कराव्यात, अशा सूचना मत्स्यव्यवसाय विभागाकडून करण्यात आल्या. पावसाळी मासेमारी बंदी 31 मे च्या मध्यरात्रीपासून सुरु होणार होती. परंतु तत्पूर्वीच बदललेल्या धोकादायक वातावरणामुळे मच्छीमारांना धोक्याचा इशारा देण्यात आला. त्यामुळे 21 मे पासूनच मासेमारी नौका समुद्रात मासेमारीसाठी जाणे थांबले आहे.