वादळानंतर मच्छीमारांची वाट आणखी बिकट 

रत्नागिरी:- नुकत्याच झालेला अवकाळी पाऊस आणि त्यापुर्वी आलेल्या वादळानंतर मासेमारीसाठी पोषक वातावरण निर्माण होईल असा अंदाज असताना अचानक आलेल्या वाऱ्यानी मच्छीमारांची पुरती गणित बिघडवली आहेत. समुद्रात पोषक स्थिती नसल्याने मच्छीमारांनी जवळपास आठवडाभर नौका बंदरात उभ्या ठेवल्या होत्या. शनिवारी नौका समुद्रात पाठवण्यात आल्या मात्र खर्च सुटेल इतकाही रिपोर्ट नसल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे. 

रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे तीनशे पर्ससीन, मिनी पर्ससीन नौका आहेत. पावसाळी बंदी उठल्यानंतर मासेमारी 1 सप्टेंबरपासून सुरू झाली. मासेमारीच्या प्रारंभापासूनच मासळी मिळण्याचा रिपोर्ट फारच कमी होता. काही मोजक्याच नौकांना समाधानकारक मासळी मिळत होती. रोजच्या खर्चाइतकीही मासळी मिळत नसल्याने अनेक नौका मालकांची आर्थिक स्थिती बिघडू लागली. यातूनच गेला आठवडाभर सुमारे 100 नौका मालकांनी आपल्या नौका समुद्रात मासेमारीसाठी सोडल्याच नाहीत. एक आठवड्याची मासेमारी करण्यासाठी 15 बॅरल डिझेल लागते. याची किंमत सुमारे 3 लाख रुपये इतकी होते. त्याचबरोबर 10 टन बर्फ नौकांमध्ये ठेवावा लागतो. याची किंमत 15 हजार रुपये होते. नौकांवर काम करणार्‍या खलाशांना आठवडाभराचे जिन्नस आणि गॅस सिलिंडर द्यावे लागते. पिण्यासाठी 6 हजार लिटर्स पाणीही द्यावे लागते. हा खर्च 30 ते 35 हजार रुपयांपर्यंत असतो. आठवडाभरानंतर नौकांवरील खलाशांना भत्ता किंवा आठवड्याचा हप्ता द्यावा लागतो. एका नौकेचा हा खर्च सुमारे 50 हजार रुपयांपर्यंत जातो.

आठवड्याचा इतका मोठा खर्च करून मासळीचा रिपोर्ट मिळत नसल्याने अनेक नौका मालकांची आर्थिक स्थिती दोलायमान झाली. त्यामुळे हा खर्च कमी करण्यासाठी नौका समुद्रात न पाठवण्याचा निर्णय घेतला गेला. मात्र, अशा परिस्थितीत खलाशांना हप्ता किंवा आठवड्याचा भत्ता द्यावाच लागला. आठवडाभरानंतर पैशाची व्यवस्था करून बंद असलेल्या नौका शनिवार पासून मासेमारीसाठी समुद्रात पाठवण्यात आल्या आहेत.