रत्नागिरी:- संशयास्पद घरपट्टी कर वसुलीवरून पालिकेच्या वसुली विभागातील दोन कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. त्याना कारणे दाखवा नोटीसा बजावून त्यांची अन्य विभागात तडकाफडकी बदली करण्यात आली. कामात कसूर केल्याचा ठपका ठेऊन दोन्ही कर्मचाऱ्यांची ही प्रशासकीय बदली करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी दिली.
शहरात सुमारे २ हजार मालमत्ताधारक आहेत. त्यांच्याकडुन सुमारे सहा कोटीच्या दरम्यान कर वसुली होते. परंतु यंदा घरपट्टी कर वसूलीवरून मोठ्या प्रमाणात आक्षेप घेतले जात आहेत. अनेकांना चुकीच्या पद्धतीने कर आकारणी केली आहे. ज्याच्याकडे भाडेकरून आहे, त्याच्याकडुन चार ते पाच पट कर आकारणी केली आहे. काहीच्या वाढीव घरपट्टी कमी करण्यासाठीही सेटिंग केली गेल्याची उदाहरणे पुढे आली. एकुणच पालिकेच्या घरपट्टी कर वसूलीवर संशयाचे बोट दाखविले जाऊ लागल. याबाबत काही नागरिक प्रसार माध्यमांकडे गेल्यानंतर याचा भांडफोड करण्याचे काम माध्यमांनी केली. याची तत्काळ दखल पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतली. त्यांनी मुख्याधिकारी तुषार बाबर यांच्याशी चर्चा करून वसुली विभागाची तातडीची बैठक लावली. यामध्ये शहरातील मालमत्तांची पंचवार्षिक सर्वेक्षणाचा आढावा घेतला.
वसुली विभागाच्या लिपिकांनी प्रत्येक घर, दुकान व इतर ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन सर्वेक्षण केले. वाढीव बांधकाम करणार्यांसह अनधिकृत बांधकाम आणि भाडेकरू ठेवणार्या २ हजार मालमत्ताधारकांना महाराष्ट्र नगर पालिका, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ११९ व १२० अन्वये इमल्यावरील कन्सॉलिडेटेड आकारणीची वाढीव घरपट्टी नोटीस बजावण्यात आल्या. यापैकी ६५० मालमत्ताधारकांनी ही आकारणी चुकीची असल्याचे तक्रारअर्ज १५ फेब्रुवारीपर्यंतच्या मुदतीपर्यंत केले आहेत. या अपिलांवर सुनावणी होऊन निर्णय घेतला जाणार आहे. नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक आणि त्यांच्या पथकासमोर ही सुनावणी होणार आहे.









