वर्षानुवर्षे सुगममध्ये काम करणारे शिक्षक दुर्गम शाळात

प्राथमिक शिक्षक बदल्या; अवघडमध्ये 160 पदे रिक्त

रत्नागिरी:- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक बदली प्रक्रियेतील अंतिम टप्प्यात अवघड क्षेत्रातील रिक्त पदांवर नियुक्त्या होणार आहेत. ही प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे सुगम क्षेत्रात वर्षानुवर्षे काम करणार्‍या शिक्षकांना यंदा प्रथमच दुर्गम शाळांमध्ये जावे लागणार आहे. अवघड क्षेत्रातील सुमारे 160 शिक्षकांची पदे रिक्त आहेत.

शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया पारदर्शक रहावी यासाठी शासनाने ऑनलाईन पध्दतीचा अवलंब केला आहे. आतापर्यंत पाच टप्प्यातील बदल्या झाल्या आहेत. सहाव्या टप्प्यात अवघड क्षेत्रातील रिक्त पदे असलेल्या शाळांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या ठिकाणी नियुक्त्या देण्यासाठी सेवा ज्येष्ठ शिक्षकांची यादी बनविण्यात आली आहे. यामध्ये वास्तव्य ज्येष्ठतेचा म्हणजे एकाच केंद्रात जास्त कालावधीसाठी काम केलेले शिक्षकांचा बदलीसाठी विचार केला गेला आहे. ही यादी शिक्षण विभागाकडून तयार करुन त्या-त्या शिक्षकांच्या लॉगीनला पाठविण्यात आली आहे. अवघड क्षेत्रातील 160 शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यावर या नेमणुका केल्या जाणार आहे. त्यासाठी बदलीसाठी पात्र ठरणार्‍या शिक्षकांना शाळा विकल्प भरावयाचे आहेत. शिक्षण विभागाकडून चार दिवसांची मुदत देण्यात आली आहे. यंदा ऑनलाईन पध्दतीने होत असलेल्या प्रक्रियेचा फटका सुगम क्षेत्रात अनेक वर्षे काम करणार्‍या शिक्षकांना बसणार आहे. नोकरीमध्ये अवघड क्षेत्रात एकही वर्षे काम न करणारे शिक्षकांना आता दुर्गम शाळेत नियुक्ती दिली जाणार आहे. यामध्ये रत्नागिरी, संगमेश्‍वर, दापोली तालुक्यातील शिक्षकांचा समावेश आहे. या शिक्षकांना रिक्त असलेल्या शाळांमध्ये जावे लागणार आहे.