कंपनीकडून खेड पोलिसांत गुन्हा दाखल
रत्नागिरी:- लोटे येथील लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीच्या प्रकल्पात काही व्यक्तींच्या गटाने बेकायदेशीररीत्या अडथळा निर्माण केल्याची घटना २० मार्च रोजी घडली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत कंपनीने खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, बेकायदेशीर जमाव हटवण्यासाठी आणि परिसरात सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी तात्काळ पोलीस हस्तक्षेपाची मागणी केली आहे.
कंपनीने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार राज्य मान्यताप्राप्त कॉमन इफ्ल्यूएंट ट्रीटमेंट प्लांट कडे प्रक्रिया केलेले आणि नॉन पीफास सांडपाणी वाहून नेणाऱ्या टँकरचा मार्ग काही व्यक्तींनी अडवला.सर्व आवश्यक नियमांचे पालन करूनही, हा टँकर प्रथम कॉ मन इफ्ल्युएंट ट्रीटमेंट प्लांट येथे आणि त्यानंतर कंपनीच्या लोते प्रकल्पात अडविण्यात आला, ज्यामुळे नियमित औद्योगिक कामकाजात मोठा व्यत्यय निर्माण झाला. या कृतीमुळे केवळ कामकाजावरच परिणाम झाला नाही, तर सुरक्षा आणि पर्यावरणासमोरही अनावश्यक धोके निर्माण झाले असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
कंपनीने स्पष्ट केले आहे की, संबंधित सांडपाण्याचे नमुने कॉमन इफ्ल्युएंट ट्रीटमेंट प्लांट अधिकार्यांनी तपासले असून ते महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने निर्धारित केलेल्या मर्यादेतच असल्याचे निष्पन्न झाले आहे. लोते येथील प्रकल्प स्थापनेपासून सर्व वैधानिक परवानग्यांसह कार्यरत असून, भारतातील सर्व पर्यावरणीय आणि नियामक नियमांचे काटेकोर पालन करत आहे. प्रकल्पातून कोणत्याही धोकादायक सांडपाण्याचा विसर्ग होत नसून, सर्व उत्सर्जनावर शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया करून त्याची योग्य विल्हेवाट लावली जाते, अशी ग्वाही कंपनीने दिली आहे.









