रोजगार मेळाव्यात 1200 जणांना जॉब ऑफर लेटर

रत्नागिरी:- मुख्यमंत्री रोजगार हमी योजना अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात रोजगार मेळावा घेण्यात आला. जवळपास अडीच ते तीन हजार उमेदवार यावेळी अर्ज घेऊन आले होते. यातून तब्बल 1200 उमेदवारांची निवड करुन त्यांना जॉबची ऑफर लेटरही दिले. मात्र प्रत्यक्षात 358 उमेदवार कामावर रुजू झाले अन्य उमेदवारांनी लांब अंतर आहे, शहरातच नोकरी हवी अशी विविध कारणे पुढे करत हजर झाले नसल्याची खंत उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली.

रविवारी रत्नागिरी जिल्हा दौर्‍यावर असताना झालेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री उदय सामंत यांनी आतापर्यंत किती लोकांना रोजगार मिळाला याविषयी बोलताना माहिती दिली. आपल्याकडे सोयी सुविधा बघितल्या जातात. नोकरीची गरज आहे तर कुठेही काम करण्याची तयारी पाहिजे, पुण्यात चांगल्या नामांकित कंपन्यांचे जॉब ऑफर लेटर देऊनसुद्धा अनेक तरुण उमेदवार कामाच्या ठिकाणी गेले नाही. आपल्याकडे घर जवळ आहेत का, नातेवाईक कोणी नाही, बाहेर कसे राहणार या सगळ्या गोष्टींचा विचार करतात. असाच रोजगार मेळावा सातार्‍यात घेण्यात आला होता. त्याठिकाणी जवळपास सर्व उमेदवारांनी ऑफर लेटर स्वीकारुन कामाच्या ठिकाणी हजर झाले. हा फरक आपल्यात असल्याची खंत सामंत यांनी व्यक्त केली.

ज्या उमेदवारांना जवळ नोकरी उपलब्ध होती त्यांना देण्यात आली. शैक्षणिक गुणवत्तेनुसार प्राधान्य देणे गरजेचे असल्याने त्यानुसार नोकर्‍या दिल्या गेल्या तरी सुध्दा आपल्याकडे 1200 पैकी केवळ 358 उमेदवार प्रत्यक्षात कामावर हजर झाले बाकी उमेदवारांनी नोकरीकडे पाठ फिरवली असल्याची खंत सामंत यांनी व्यक्त केली.