मिलिंद किर यांची उद्योगमंत्री ना. सामंत यांच्याकडे मागणी
रत्नागिरी:- जिल्ह्यातील तरुणांना बेरोजगारीमुळे नोकरी आणि व्यवसायासाठी जिल्ह्याबाहेर विस्थापित व्हावे लागत आहे. त्यामुळे आता उद्योग मंत्री या नात्याने रत्नागिरी तालुक्यात पंचतारांकीत एमआयडीसी आणावी, अशी मागणी मंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद कीर सांगितले.
हे निवेदन उद्योगमंत्र्यांच्या कार्यालयात टपालातून दिले आहे. ही माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले, रत्नागिरी तालुक्यात २००४-२००५ दरम्यान पंचतारांकीत एमआयडीसी मंजूर झाली होती; मात्र, विरोधानंतर ती तत्कालीन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे म्हणजेच कागलला (ता. कोल्हापूर) नेण्यात झाली. आज तेथे ८० ते ९० हजारांहून अधिक लोकांना रोजगार मिळाला आहे. आपल्या जिल्ह्यातील तरुणांना बेरोजगारीमुळे विस्थापित व्हावे लागते. या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे आता उद्योग मंत्री या नात्याने रत्नागिरी तालुक्यात पंचतारांकीत आणणे काळाची गरज आहे.
ते पुढे म्हणाले की, प्रदुषण विरहीत उद्योग व कारखाने यावेत यासाठी आणि रोजगार मिळण्यासाठी स्थानिकांकडून आग्रह धरला जात आहे. गेली अठरा वर्षे सामंत हे आमदार आहेत. त्यांनी यापुर्वीही विविध मंत्रीपदे भुषवली आहेत. सत्तेत असतानाही त्या-त्या वेळच्या उद्योगमंत्र्यांकडून एखादा उद्योग रत्नागिरी तालुक्यात त्यांनी आणणे अपेक्षित होते; परंतु त्यांना तसे करता आले नाही. आज उद्योग मंत्री पद आहे. त्या माध्यमातून रत्नागिरी विधानसभा मतदार संघात पंचतारांकीत एमआयडीसी मंजूर करावी जेणेकरून नोकरी, व्यवसायाचे प्रश्न सुटेल. लोकांना स्वतःच्या शहरामध्ये राहून नोकरी , व्यवसाय करण्याची संधी प्राप्त होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पत्रकार परिषदेवेळी राष्ट्रवादीचे निलेश भोसले उपस्थित होते.