कोकण हापूस आंबा उत्पादक आणि विक्रेते सहकारी संस्थेतर्फे मागणी
रत्नागिरी:- आंबा हंगामात कोकण रेल्वे स्थानकांवर हापूस आंबाविक्रीसाठी देण्यात येणारे स्टॉल कोकणातील पाच जिल्ह्यातील शेतकरी किंवा त्यांचे अधिकृत विक्रेते यांनाच द्यावेत. त्यासाठी आवश्यक पुरावा घ्यावा, अशी मागणी कोकण हापूस आंबा उत्पादक आणि विक्रेते सहकारी संस्थेतर्फे करण्यात आली आहे.
कोकणातील हापूस आंबाविक्रीसाठी कोकण रेल्वेकडून वेळोवेळी वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येतात. वाहतुकीसाठीही प्राधान्य दिल्यामुळे हापूसचे नाव दूरवर पोहचण्यास मदत झाली. कोकणातील पाच जिल्हातील भौगोलिक परिस्थितीमध्ये तयार होणाराच अस्सल हापूस आहे हे भौगोलिक मानांकन मिळाल्यानंतर स्पष्ट झाले आहे. कोकण हापूस आंबा उत्पादक आणि विक्रेते सहकारी संस्था, देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्था, आंबा उत्पादक सहकारी संस्था मर्यादित केळशी आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ या चार संस्था हापूस जीआयचे प्रोप्रायटर आहेत. त्यामुळे हापूसच्या संबंधात प्रसार, प्रचार, शेतकर्याला हापूसचे भौगोलिक मानांकन नोंदणी मिळवून देणे ही कामे या संस्था करत आहेत. बाजारात हापूसच्या नावाखाली कोकण सोडून इतर प्रदेशात पिकवलेले आंबेही आता काही व्यापारी, दलाल विकण्याचा प्रयत्न करतात. त्याला आळा घालण्यासाठी प्रशासनानेही खबरदारी घेण्याची मागणी संघटनेने केली आहे.
कोकण रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे स्थानकांवर स्थानिक शेतकर्यांना हापूस आंबाविक्रीसाठी स्टॉल उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या शिवाय रेल्वेमध्येही फिरत्या विक्रेत्यांनाही हापूस विक्रीची परवानगी दिली जाणार आहे. मात्र, त्यांना परवानगी देतना स्थानिकांनाच परवाना द्यावा, अशी मागणी उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्थेतर्फे करण्यात आली आहे.
हे स्टॉल देण्यापूर्वी संबंधित व्यक्ती शेतकरी किंवा त्याचा मान्यताप्राप्त प्रतिनिधी आहे किंवा नाही याची खात्री करावी. तो शेतकरी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे जिल्ह्यातील आहे का? याचा पुरावा घ्यावा. शिवाय शेतकर्याच्या नावे सातबारा असल्याची पाहणी करावी. त्याने भौगोलिक मानांकन, मँगोनेट नोंदणी केली आहे का? याची खात्री करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.