रत्नागिरी:- पापलेट राज्यमासा म्हणून घोषित केल्यानंतर म्हाकुळ, कोळंबी, बांगडा, तारली, पापलेट, गेदर, बोंबील, धोमा, घोळ, लेप या सह 54 माशांचे आकारमान निश्चित करून त्यांची खरेदी, विक्री आणि मासा पकडण्यावर राज्य सरकारने निर्बंध घातले आहेत. याच्या फायद्या-तोट्यापासून ते निर्णय योग्य की अयोग्य, याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र शासन निर्णय आल्यानंतर त्याची अंमलबाजवणी करण्यासाठी कोकणीतील समुद्रकिनारी जिल्ह्यात मत्स्य विभाग सज्ज झाला आहे. सुरुवातील जनजागृतीवर भर देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
मुंबईसह कोकणाला लाभलेल्या किनारपट्टीवर मोठ्याप्रमाणात माशांची खरेदी-विक्री होत असते. परंतु गेल्या काही वर्षात छोट्या आकाराचे मासे मारले जाऊ लागल्यामुळे काही माशांच्या जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांचे संवर्धन करण्यासाठी शासनाने छोटे मासे पकडण्यावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. माशांचं आकारमान निश्चित करून त्यांच्या पकडण्यापासून ते खरेदी विक्रीपर्यंत राज्य सरकारनं निर्बंध आणले आहेत. शेवंड, म्हाकुळ, कोळंबीच्या काही प्रजाती, काही शार्क, करकटा बांगडा, हलवा, तारली, मांदेली, पापलेट, गेदर, बोंबील, धोमा, घोळ, लेप अशा ५४ प्रकारच्या मासळीच्या किमान कायदेशीर आकारमानाची शिफारस करण्यात आली आहे. निश्चित केलेल्या आकरामानापेक्षा आकाराने लहान असलेला मासा पकडता येणार नाही. त्याशिवाय त्याची खरेदी-विक्री करता येणार नाही. आकारमान निश्चित केलेल्या माशांमध्ये सुरमई 370 मिमी, बांगडा 140 मिमी, सरंगा 170 मिमी, तारली 100 मिमी, सिल्वर पापलेट 135 मिमी, चायनीज पापलेट 140 मिमी, भारतीय म्हाकूळ 100 मि मी, झिंगा कोळंबी 90 मिमी, मांदेली 115 मिमी, मुंबई बोंबील 180 मिमी, खेकडा ५० ते ९० यासह घोळ, मांदेली, राणी, सौंदाळा, ढोमा, प्रजाती मिळून 54 प्रजातींचा समावेश आहे.
माशांचे साठे कमी होत असून काही मासे लुप्त होण्याकडे वाटचाल करत आहेत. त्यामुळे संवर्धनाच्या दृष्टीने शासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये अनेक अडचणीदेखील आहेत. समुद्रात जाळी टाकून मासे पकडत असताना त्याचे आकरमान समजत नाही. अत्याधुनिक यंत्रणेद्वारे मासे कुठे मिळू शकतात याची माहिती दाखवली जाते. त्या परिसरात जाऊन मच्छिमार जाळी टाकतात. एकाचवेळी जाळ्यात सापडणाऱ्या माशांचे आकार वेगवेगळे असतात. जोपर्यंत मासे जाळ्यामधून बाहेर काढले जात नाहीत, तोपर्यंत त्यावर मच्छिमार काहीच करू शकत नाहीत. त्यामुळे छोटे मासे जाळ्यात आले, तर विनाकारण मच्छिमार कारवाईस पात्र ठरू शकतो. याबाबत योग्य त्या सुचना करणे आवश्यक असल्याचे मच्छिमारांचे मत आहे.