राज्यनाट्य स्पर्धेत रत्नागिरी केंद्रातून ‘अग्निपंख’ प्रथम

निकाल जाहीर, ‘ईठ्ठला’ अंतिम फेरीत

रत्नागिरी:- सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. रत्नागिरी केंद्रातून समर्थ रंगभूमी, रत्नागिरी संस्थेच्या ‘अग्निपंख’ या नाटकाने प्रथम पारितोषिक पटकावले आहे. तर, वीरशैव समाज, लांजा संस्थेच्या ‘ईठ्ठला’ नाटकाला द्वितीय पारितोषिक मिळाले आहे. सांस्कृतिक कार्य संचालक श्री. बिभीषण चवरे यांनी ही घोषणा केली. या दोन्ही नाटकांची निवड राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी करण्यात आली आहे.

​अग्निपंख नाटकाने प्रथम क्रमांकासह तब्बल सात पारितोषिके पटकावली. जाहीर करण्यात आलेल्या निकालामध्ये समर्थ रंगभूमीचे अग्निपंख प्रथम तर वीरशैव समाज, लांजाचे ईठ्ठलाने द्वितीय क्रमांक पटकावला. याशिवाय इम्युनिटी (द व्हाइस ऑफ टॉलरन्स) खरडेवाडी क्रिडा मंडळ, मेर्वी या नाटकाला तृतीय क्रमांक जाहीर करण्यात आला.

​रत्नागिरी केंद्रावर सादर झालेल्या १८ नाट्यप्रयोगांमधून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कलावंत आणि तंत्रज्ञांना वैयक्तिक पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. सर्वोतृष्ट दिग्दर्शन ओंकार पाटील (‘अग्निपंख’) अमोल रेडीज (‘ईठ्ठला’) संदेश तोडणकर (‘इम्युनिटी’) यांना जाहीर करण्यात आले. उत्कृष्ट प्रकाश योजना साई शिर्सेकर (‘अग्निपंख’) दयानंद चव्हाण (‘ईठ्ठला’) अभिजीत डोंगरे (‘इम्युनिटी’) यांना जाहीर करण्यात आले. उत्कृष्ट नेपथ्य प्रविण धुमक (‘अग्निपंख’) संदिप सावंत (‘ईठ्ठला’) सत्याजीत गुरव (‘येऊन येऊन येणार कोण?’) यांना जाहीर करण्यात आले.

उत्कृष्ट रंगभूषा उदयराज तांगडी (‘अग्निपंख’), गजानन पांचाळ (‘ईंठ्ठला’) आणि नरेश पांचाळ (‘इम्युनिटी’) यांना जाहीर करण्यात आले. उत्कृष्ट संगीत दिग्दर्शन ओंकार बंडबे (‘अग्निपंख’) प्रदिप कांबळे (‘ईंठ्ठला’) योगेश मांडवकर (‘इम्युनिटी’) यांना जाहीर करण्यात आले. उत्कृष्ट वेशभूषा चैताली पाटील (‘अग्निपंख’) संतोष डोर्लेकर (‘ईठ्ठला’) यांना जाहीर करण्यात आले.

उत्कृष्ट अभिनयासाठी रौप्यपदके जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये उत्कृष्ट अभिनयासाठीची रौप्यपदके मिनार पाटील (‘अग्निपंख’) आणि ऋचा भुते (‘अग्निपंख’) या कलावंतांनी पटकावली.

​अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे मिळवणाऱ्या कलाकारांमध्ये अमोल रेडीज (‘ईठ्ठला’), जयू पाखरे (‘ऑक्सिजन’), संदेश तोडणकर (‘इम्युनिटी’), गोपाळकृष्ण जोशी (‘येऊन येऊन येणार कोण ?’), अर्चना पेणकर-पांचाळ (‘ईठ्ठला’), तन्वी शिंदे (‘इम्युनिटी’), डॉ. नेहा उकिडवे (‘मंगलाक्षता’), निवेदिता मणचेकर (‘ऑक्सिजन’) यांना जाहीर करण्यात आली आहेत.