राजापूर:- पश्चिम घाटाच्या विविधांगी वनसंपदेचा वारसा लाभलेल्या रत्नागिरी जिल्ह्याच्या जंगलपरिसरामध्ये विविध दुर्मिळ प्राणी-पक्ष्यांसह अन्य वन्यजीवांचे वास्तव्य राहीलेले आहे. विविध कारणास्तव जखमी होणार्या या वन्यजीवांवर तात्काळ प्राथमिक उपचार करता यावेत यादृष्टीकोनातून राजापूर तालुक्यामध्ये वनविभागातर्फे ‘वन्यजीव प्राथमिक उपचार केंद्रा’ची उभारणी करण्यात येणार आहे.
राजापूरात उभारले जाणारे हे रत्नागिरी जिल्ह्यातील पहिले वन्यजीव प्राथमिक उपचार केंद्र ठरणार आहे. सर्वसोयीसुविधांनीयुक्त या प्राथमिक उपचार केंद्रामुळे जखमी होणार्या प्राणी-पक्ष्यांसह अन्य वन्यजीवांवर तात्काळ प्राथमिक उपचार होवून त्यांचा जंगलपरिसरातील नैसर्गिक अधिवासातील पुढील जीवनप्रवास अधिक सुखकर होणार आहे.
वनविभागाच्या जागेमध्ये हे प्राथमिक उपचार केंद्र उभारण्याला प्राधान्य देण्यात येणार असून त्यामध्ये शहरानजीकच्या धोपेश्वर येथील सुमारे 23 हेक्टर क्षेत्र विचाराधीन आहे. मात्र, अपेक्षित असलेली मुबलक वा विस्तीर्ण प्रमाणात जागा वनविभागाकडे उपलब्ध न झाल्यास महसूल विभागाकडून जागा उपलब्ध करण्याच्यादृष्टीने वनविभागातर्फे प्रयत्न सुरू आहेत.
या प्राथमिक उपचार केंद्रातील नियोजन अन् सोयीसुविधांसह तांत्रिक बाबींच्या उभारणीसाठी सुमारे दिड कोटी रूपये निधीची आवश्यकता असून त्याचा प्रस्ताव मंजूरीसाठी शासनाकडे वनविभागाकडून पाठविण्यात आलेला आहे.
विविध कारणांमुळे जखमी होणार्या वन्यजीवांवर तात्काळ उपचार करणे गरजेचे असते. विशेषतः वन्यप्राण्यांवर उपचार करताना कमीत कमी मानवी संपर्क व तातडीने उपचार करून त्यांना लवकरात लवकर मूळ अधिवासामध्ये सोडावे लागते.
या उपचारांसाठी वेगळ्या सुविधांची आवश्यकता असते. मात्र, सद्यस्थितीमध्ये जखमी वन्यजीवांवर उपचार करण्यासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यातील उपलब्ध सुविधांचा वापर करावा लागतो. या सार्या गोष्टी विचारात घेवून वनविभागातर्फे वन्यजीव प्राथमिक उपचार केंद्राची राजापूरात उभारणी केली जाणार आहे. या केंद्राचा रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यासह लगतच्या कोल्हापूर जिल्ह्यालाही उपयोग होणार आहे.
प्राथमिक उपचार केंद्रामध्ये या असणार सुविधा
रेस्क्यू टिम, बचाव पथक, तज्ञ डॉक्टर, ऑपरेशन सेंटर, ट्रीटमेंट सेंटर, अॅम्ब्युलन्स, वन्यजीवांना नैसर्गिक अधिवासाशी मिळते-जुळते वातावरण, वन्यजीवांना सुरक्षित ठेवण्यासाठी पिंजरे
” जखमी झालेल्या वन्यप्राणी-पक्षी यांसह अन्य वन्यजीवांवर अनेकवेळा तात्काळ प्राथमिक उपचार करणे गरजेचे असते. मात्र, तशा सुविधा उपलब्ध नसल्याने तात्काळ प्राथमिक उपचार करणे शक्य होत नाही. ही बाब लक्षात घेवून राजापूर तालुक्यामध्ये सर्वसोयीसुविधांनीयुक्त वन्यजीव प्राथमिक उपचार केंद्राची उभारणी केली जाणार आहे. त्याच्या मंजूरीसह निधी उपलब्धततेचा प्रस्ताव शासनाकडे मंजूरीसाठी पाठविण्यात आलेला आहे.”
- –गिरीजा देसाई, विभागीय वनअधिकारी








