रत्नागिरी:- प्रशासकिय राजवट असलेल्या रत्नागिरी नगर परिषद प्रशासनाने आता आवश्यक दाखले व उतार्यासाठी आकारल्या जाणार्या शुल्कात दुप्पटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दाखले उतारे शुल्क वाढून सामान्य नागरिकांवर आर्थिक भार पडणार आहे. त्यापेक्षा नगर परिषदेने कर वसुली करणे जास्त आवश्यक आहे. यामुळे दाखले उतारे शुल्क वाढविण्यापेक्षा कर वसुली व खर्चाचे नियोजन केले तर ते जास्त योग्य होईल असे रत्नागिरीतील सामाजिक कार्यकर्ते अमेय परुळेकर यांनी पशासनाला सुचवले आहे.
नगर परिषद प्रशासनाने नागरिकांना देण्यात येणार्या दाखले व उताऱयांसाठी आकारल्या जाणार्या शुल्कात दुप्पटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला. नगर परिषद प्रशासनाने केलेल्या ठरावानुसार उतारा, दाखल्यांचे नवे दर असेसमेंट उतारा 200 रु., असेसमेंट नाव दाखल व दुरुस्त करणे 750 रु., व्यावसायिकसाठी दाखला 2000 रु., वसुली विभागाकडून देण्यात येणारे सर्व दाखले 200 रु.प्रत्येकी. भुखंड नसलेबाबत दाखला 200 रु.सर्व्हेक्षण उतारा 20 रु.प्रती प्रत अशी आहे. त्यामुळे नागरिकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार असून त्यामुळे नव्या दरवाढीवरुन पुन्हा गदारोळ होण्याची शक्यता आहे. त्यावर नागरिकांकडून हरकती मागवण्यात आल्या होत्या. त्या प्राप्त झालेल्या हकरतींवर गुरूवारी 22 डिसेंबर रोजी नगर परिषदेत सुनावणी घेण्यात आली.
प्रशासनाने उतारे व दाखल्यांसाठी आकारल्या जाणार्या शुल्कासाठी दि. 11 नोव्हेंबरपर्यंत नागरिकांच्या हरकती मागविण्यात आल्या होत्या. नागरिकांनी हरकत न घेतल्यास 1 जानेवारी 2023 पासून नव्या दराची अंमलबजावणी होणार आहे. विभागिय कोकण आयुक्तांच्या दि. 8 जूनच्या सुचनेनुसार पालिकेचे उत्पन्न वाढीसाठी उतारे, दाखल्यांच्या शुल्कात दुप्पटीने वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आहे. तशी सुचना रत्नागिरी नगर परिषदेने प्रसिद्ध केली होती. नव्या दरवाढीची सुचना प्रसिद्ध झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते अमेय परुळेकर यांच्यासह माजी नगराध्यक्ष मिलींद कीर, निलेश भोसले, विजय जेन, आदीं अनेक नागरिकांनी हरकती नोंदवल्या. त्यामुळे भविष्यात नवे दर लागू होण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी नगर परिषद मुख्याधिकारी यांचे समोर दाखले उतारे शुल्क वाढी बद्दलच्या हरकती बाबत गुरूवारी सुनावणी झाली. त्यावेळेला रत्नागिरीचे सामाजिक कार्यकर्ते यांनी काही मुद्दे मांडले. अमेय परुळेकर यांनी सांगितले की, दाखले उतारे शुल्क वाढून सामान्य नागरिकांवर आर्थिक भार पडणार आहे. त्यापेक्षा नगर परिषदेने कर वसुली करणे जास्त आवश्यक आहे. रत्नागिरी शहरात राजकरणी व्यक्तींचे बॅनर पोस्टर बरेच दिवस असतात. उदाहरणार्थ दत्त जयंती शुभेच्छा बद्दल पोस्टर दत्त जयंतीच्या आधी काही दिवस लागले जाते व दत्त जयंती होवून नंतर देखील ते पोस्टर तसेच राहते. ते पोस्टर लावायला कायदेशीर परवानगी घेतली की नाही किंवा किती दिवस घेतली होती हे बघणे देखील महत्वाचे आहे. राजकीय व्यक्तीच्या पोस्टर मधून देखील कर वसुली होवू शकते असेही परुळेकर यांनी सांगितले. त्यामुळे दाखले उतारे शुल्क वाढविण्यापेक्षा कर वसुली व खर्चाचे नियोजन केले तर ते जास्त योग्य होईल.