रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ११ जागांसाठी आज मतदान झाले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ११ हजार ११० मतदानापैकी ३ हजार ४१५ म्हणजे एकूण ३२.३७ टक्के मतदान झाले. त्यामुळे सर्व उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद झाले. कमी मतदान झाल्याने निवडणुकीत काँटे की टक्कर होणार आहे. उद्याच (ता. २९) निकाल असल्याने कोणाच्या गळ्यात संचालकपदाची माळ पडणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ११ जागांसाठी १४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यासाठी आज मतदान प्रक्रिया झाली. जिल्ह्यात 9 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया झाली. सकाळी 10 वाजेपर्यंत 405, 12 वाजेपर्यंत 820 तर दुपारी 3 वाजेपर्यंत 2 हजार 469 जणांनी मतदान झाले. त्यानंतर सायंकाळी 5 वाजेपर्यंत ११ हजार ११० पैकी एकूण ३ हजार ४१५ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण मतदानापैकी ३२.३७ टक्के मतदान झाल्याचे बाजार समितीने सांगितले. यामध्ये सहकारी संस्था मतदार संघातून 1 हजार ६२१ तर ग्रामपंचायत मतदार संघातून 1 हजार ७९४ जणांनी मतदान केले. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.
बाजार समितीसाठी सहकार पॅनेलमधून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, ठाकरे सेना, शिंदे शिवसेना आणि भाजप असे सर्व पक्ष एकत्र आले आहेत. 3 अपक्ष उमेदवारांमुळे निवडणूक घ्यावी लागली. सहकार पॅनेलचे हेमचंद्र माने, गजानन पाटील, सुरेश कांबळे हे ३ संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. मतदान अपेक्षेपेक्षा कमी झाले असून, ११ उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद झाले. उद्या २९ ला मतमोजणी होणार असून, संचालक मंडळ निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. सहकार पॅनेलमधून ठाकरे सेना, शिंदे गट यांना प्रत्येकी ४, भाजपा, काँग्रेसला प्रत्येकी २, राष्ट्रवादीला ५ जागा देण्यात आल्या आहेत.