रत्नागिरी पोलिसांनी ‘हरवलेले 45 मोबाईल’ नागरिकांना केले परत

रत्नागिरी:- हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी रत्नागिरी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. या मोहिमे अंतर्गत हरवलेल्या ४५ मोबाईलचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. सापडलेल्या ४५ पैकी २७ जणांचे फोन त्यांना परत करण्यात आले आहेत.

जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. धनंजय कुलकर्णी तसेच अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गहाळ झालेल्या मोबाईलची माहिती काढण्यात आली. सप्टेंबर २०२३ ते मार्च २०२४ पर्यंत सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीमधून गहाळ झालेले मोबाईलची माहिती सायबर पोलीस ठाणे रत्नागिरीचे पोलीस निरीक्षक श्री. अमित यादव, सहा. पोलीस निरीक्षक श्री. नितीन पुरळकर, म.पोहवा दुर्वा शेट्ये, तांत्रिक विश्लेषण शाखेचे पोहवा रमिज शेख, पोशि निलेश शेलार यांनी तसेच रत्नागिरी शहर, लांजा, चिपळूण, राजापुर, सावर्डे, देवरुख या पोलीस ठाण्याच्या पोलीस अंमलदार यांनी एकत्रित काम करुन प्राप्त माहितीच्या आधारे विविध पोलीस ठाणे येथे दाखल गहाळ मोबाईलचा शोध घेतला.

या प्रक्रिये मध्ये त्यांनी एकूण ४५ मोबाईलचा शोध घेतला. सापडलेले मोबाईल परत मिळविण्यात त्यांना यश आले आहे. ८ एप्रिल रोजी हे परत मिळविण्यात आलेले गहाळ मोबाईल त्यांचे मूळ मालकांना, पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक कार्यालय येथे परत देण्यात आले. या प्रसंगी, एकूण २७ मोबाईलचे मालकांना त्यांचे मोबाईल परत देण्यात आले असून उर्वरीत सर्व मोबाईल मालकांना त्यांचे मोबाईल सायबर पोलीस ठाणे येथून घेऊन जाण्याबाबत पोलीस अधीक्षक श्री. धनंजय कुलकर्णी यांनी आवाहन केले आहे तसेच सायबर क्राईम सारख्या गुन्ह्याला बळी पडलेल्या व्यक्तीने तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनकडे संपर्क साधण्याबाबतही त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.