रत्नागिरी-पावस मार्गावर ट्रक पलटी: चालक जखमी

रत्नागिरी:- रत्नागिरी-पावस मार्गावर गोळपधार येथे गुरुवारी रात्री उशिरा एक मालवाहू ट्रक उलटल्याने चालक जखमी झाला आहे. हा अपघात २१ ऑगस्ट रोजी रात्री १० च्या सुमारास घडला. चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग येथील रहिवासी सय्यद अन्सार पाशा (वय ५०) हा अशोक लेलँड कंपनीचा ट्रक (क्रमांक केए-१६/एए-१४११) घेऊन फिनोलेक्स कंपनीतून गोळप ते राणी बेन्नूर, कर्नाटकच्या दिशेने जात होता. रात्री १०.०० वाजण्याच्या सुमारास गोळपधार येथील वळणावर रस्त्याची स्थिती लक्षात न घेता, त्याने अतिशय निष्काळजीपणे आणि वेगाने वाहन चालवले. यामुळे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि तो रस्त्यावरच उलटला.
या अपघातात ट्रक चालक सय्यद अन्सार पाशा गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यासोबतच ट्रकमध्ये असलेल्या मालाचे आणि वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे.

या घटनेची माहिती मिळताच, पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार महेश अरविंद कुबडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.