रत्नागिरी पालिकेच्या तिजोरीत खडखडाट

सुदेश मयेकर ; अनेक कामांची मोठी देय रक्कम

रत्नागिरी:- रत्नागिरी पालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याने अर्थसंकल्पात तरतूद असलेल्या कामांनाच वर्कऑर्डर दिली जात आहे. अन्य कामे थांबली असून झालेल्या अनेक कामांची मोठी देय रक्कम आहे. त्यामुळे शहराचा विकास सध्यातरी खुंटला असून पालिकेवर आर्थिक बोजा वाढण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे माजी गटनेते सुदेश मयेकर यांनी याबाबत पालिका प्रशासनाकडे अदा झालेली देयके आणि प्रलंबित देयके याबाबत व पालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये तरतूद, झालेल्या खर्चाची माहिती मागवली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी पालिकेला दिले आहे.

पालिकेच्या इतिहासामध्ये प्रथमच वर्षभर प्रशासकाची नियुक्ती झाली आहे. प्रशासनाच्या कालावधीमध्ये पालिकेची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. यापूर्वी मोठ्या प्रमाणात विकासकामे घेण्यात आली. अर्थसंकल्पातील तरतुदीचा विचार करता ही कामे घेण्यात आली. त्यामुळे ठेकेदार अडचणीत आले आहेत. ठेकेदार पद्धतीवर घेतलेल्या कामगारांचेही पगार थकल्याने हे कामगार आक्रमक झाले आहेत.२०१४ ते १९ मध्ये पालिकेवर मोठा आर्थिक बोजा होता. मंजुरीच्या अंतरावर अनेक विकासकामे घेण्यात आली. त्याची कोणतीही तरतूद अर्थसंकल्पामध्ये नव्हती. सुमारे ३२ कोटीचा बोजा पालिकेवर होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय कोणतीही विकासकामे घेण्यात येत नव्हती. एवढी गंभीर आर्थिक परिस्थिती होती. नगराध्यक्ष म्हणून सव्वा वर्षाची टर्म मिलिंद कीर यांना मिळाल्यानंतर त्यांनी विविध शासकीय योजनांचा अभ्यास करून पालिकेवरील आर्थिक बोजा कमी केला होता. खडखडाट झाला आहे. याबाबत राष्ट्रवादीचे माजी गटनेते सुदेश मयेकर यांनी डिसेंबर २०२१ ते नोव्हेंबर २०२२ पर्यंत पालिका प्रशासनाकडून अदा झालेली देयके प्रलंबित देयकाबाबत माहिती मिळावी. ही माहिती देताना पालिकेचे वार्षिक अंदाज पत्रकामध्ये केलेली तरतूद व त्यावर झालेला खर्च याबाबतचीही माहिती देण्यात यावी, असे पत्रात म्हटले आहे.