रत्नागिरी:- रत्नागिरी ते नागपूर या महामार्गाच्या चौपदरी कामासाठी एकूण १८ कंपन्यांनी टेंडर दाखल करून उत्सुकता दाखविली आहे. निविदा दाखल करण्याचा सोमवारी (ता. २१) शेवटचा दिवस होता. दोन वेळा या निविदा प्रक्रीयेस अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे मुदत वाढविण्यात आली होती.
रत्नागिरी ते नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ च्या चौपदरीकरणासाठी टेंडर मागविण्यात आल्या होत्या. अखेरच्या दिवसापर्यंत १८ कंपन्यांनी टेंडर सादर केले. आता तांत्रिक आणि कायदेशीबाबींची तपासणी होऊन पुढील प्रक्रीया पूर्ण होईल. त्यानंतर नेमके कोणत्या कंपनीला कामाचा ठेका दिला जाणार हे स्पष्ट होणार आहे. तब्बल १४ कंपन्यांनी एकाच दिवशी म्हणजे २१ फेब्रुवारीला टेंडर दाखल केले आहे. तर १८ आणि २० फेब्रुवारीला प्रत्येकी एक तर १९ फेब्रुवारीला दोन टेंडर दाखल झाल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून देण्यात आली. दरम्यान महामार्गाच्या पहिल्या टप्प्यासाठी १८, दुसर्या टप्प्यासाठी १८ तर तिसर्या टप्प्यासाठी १५ कंपन्यांनी निविदा दाखल केले आहे.