रत्नागिरी, दापोली तहसीलदारांची बदली

रत्नागिरी:- शासनाने महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्यांचे आदेश बुधवारी (ता. १२) रात्री उशिरा काढले. यामध्ये रत्नागिरी, दापोली तहसीलदारांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. रिक्त असलेल्या निवासी उपजिल्हाधिकारीपदावर हिंगोली येथील चंद्रकांत सूर्यवंशी यांची नियुक्ती झाली आहे. रत्नागिरी तहसीलदार शशिकांत जाधव यांची बदली साताऱ्याला झाली आहे.

गेल्या तीन वर्षांमध्ये त्यांनी उत्तम कारभार केला. नैसर्गिक आपत्तीसह सामाजिक आणि प्रशासकीय कामामध्ये त्यांचा चांगलाच हातखंडा आहे. जनतेशीही त्यांचे संबंध सलोख्याचे होते. त्यांची बदली आता साताऱ्याला झाली आहे. त्यांच्या जागी सिंधुदुर्ग येथील राजाराम म्हात्रे यांची रत्नागिरी तहसीलदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दापोलीच्या तहसीलदार वैशाली पाटील यांची ठाण्याला झाली असून त्याच्या जागी अर्चना बोंबे यांची नियुक्ती झाली आहे.
रायगड श्रीवर्धनचे तहसीलदार सचिन गोसावी यांची रत्नागिरी जिल्ह्यातील अपर तहसीलदार व शेतजमीन न्यायाधिकरण या रिक्त पदावर बदली करण्यात आली आहे. तर चिपळूण तहसीलदार म्हणून श्री. लोकरे यांनी पदभार घेतला आहे.

रत्नागिरी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचे पद अनेक वर्षांपासून रिक्त होते. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी गायकवाड यांच्याकडे त्याचा अतिरिक्त पदभार होता. महसूल विभागाने केलेल्या बदल्यांमध्ये रत्नागिरी निवासी उपजिल्हाधिकारी पदी हिंगोलीतील चंद्रकांत सूर्यवंशी यांची नियुक्ती केली आहे. तहसीलदार शशिकांत जाधव यांना आज कर्मचार्‍यांनी निरोप दिला. तसेच पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. नवनियुक्त तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी आजच कारभार स्वीकारला.