रत्नागिरी तालुक्यात नऊ ठिकाणी महिलाराज

रत्नागिरी पंचायत समितीचे वीस गणांसाठी आरक्षण निश्चित

रत्नागिरी:- रत्नागिरी पंचायत समितीच्या आगामीनिवडणुकीसाठीची बहुप्रतिक्षित आरक्षण सोडत मंगळवारी काढण्यात आली असून, एकूण वीस गणांसाठीचे आरक्षण निश्चित झाले आहे.

लोकनेते शामराव पेजे सभागृहात आरक्षण सोडत काढण्यात आली. यामध्ये दहा गण महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आले. त्यामध्ये नाणीज गण अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. उपविभागीय अधिकारी जीवन देसाई आणि तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या नियंत्रणाखाली ही प्रक्रिया पार पडली.

महिलांसाठी राखीव असलेली प्रवर्ग

वाटद, कळझोंडी, नेवरे, झाडगाव म्यु. हद्दी बाहेर, गावखडी आणि भाटये हे 6 गण सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहेत. खालगाव, हातखंबा, आणि कर्ला या गणांमध्ये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला यांना संधी मिळाली आहे.

सर्वसाधारण राखीव जागा

करबुडे, कोतवडे, साखरतर, खेडशी, केळये, कुवारबाव, नाचणे, आणि गोळप हे आठ गण सर्वसाधारण गट/प्रवर्ग म्हणून खुले आहेत.

नाणीज गण अनुसूचित जाती प्रवर्ग (SC) साठी राखीव झाला आहे. हरचिरी आणि पावस हे २ गण नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गसाठी आरक्षित झाले आहेत. या आरक्षणामुळे इच्छुकांमध्ये आता हालचालींना वेग येणार असून, निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे.