रत्नागिरी तालुक्यात डेंग्यूचा वाढला फैलाव; आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर

रत्नागिरी:- संपूर्ण जिल्ह्याच्या मानाने रत्नागिरी शहरात डेंग्यूरुग्णांची संख्या वाढते आहे. या परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेत जिल्हा शल्य चिकित्सकांकडून नगर परिषद प्रशासनाला डास प्रतिबंधक उपाययोजना करण्याबाबत पत्र पाठवण्यात आले आहे. त्यामुळे नगर परिषद प्रशासन खडबडून जागे झाले असून रत्नागिरी शहरात ठिकठिकाणी औषध फवारणी तसेच जनजागृतीचे काम सुरु करण्यात आले आहे.

पावसाळा सुरु होताच जिल्ह्यात डेंग्यूरुग्णांची संख्या आता वाढायला लागली आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांच्या माहितीनुसार, जिल्ह्यात सध्या डेंग्यूचे १२७ रुग्ण उपचार घेत आहेत. यात एकट्या रत्नागिरी तालुक्यात ९० तर ग्रामीण भागात ३४ रुग्णांचा समावेश आहे. शहरामधील डेंग्युच्चा रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा आरोग्य विभागाकडून नगर परिषदेला उपाययोजना करण्याची सूचना देण्यात आली आहे.

डेंग्यूच्या वाढता फैलाव रोखण्यासाठी नगर परिषद प्रशासन खडबडून जागे झाले आहे. रत्नागिरी नगर परिषदेकडून आता परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेत सर्व विभागांमध्ये उपाययोजना करण्यास सुरुवात झाल्याचे सांगण्यात आले. शहरांमध्ये सर्वत्र फवारणी करण्यात येत आहे. ठीकठिकाणी डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी औषध फवारणी करण्यास सुरुवात झाली आहे. तसेच काही ठिकाणी केमिकलचीही फवारणी केली जात आहे. नागरिकांमध्ये डेंग्युबाबत जनजागृती करण्यासाठी ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत. तसेच शहरतील आशा कार्यकर्त्या आजपासून घराघरात जाऊन नागरिकांना डेंग्युबाबत माहिती देणार आहेत. तसेच शहरात ज्या ठिकाणी पाणी साचलेले दिसेल, अशा जागा नगर परिषदेला कळवण्याची जबाबदारी या
आशा सेविकांना देण्यात आली आहे. अशा जागा निश्चित झाल्यावर त्या ठिकाणी औषध फवारणी करण्यात येणार असल्याचे नगर परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले.