रत्नागिरी:-वाढत्या उष्म्यामुळे विजेची मागणीही वाढली असून रत्नागिरी जिल्ह्यात मार्च महिन्यानंतर १० मेगॉवाट विजेचा अधिक वापर होत आहे. वाढत्या वापरामुळे राज्यावर अत्यावश्यक भारनियमानाचे संकट निर्माण झाले आहे; मात्र पहिल्या टप्प्यात ई, एफ गटातील म्हणजेच चोरीचे प्रमाण असलेल्या फिडरवर (रोहित्र) अंमलबजावणी होणार आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश नसल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.
मार्च, एप्रिल या दोन महिन्यात राज्यात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव जाणवत आहे. दिवसभर पारा ३६ अंशावर पोचला आहे. त्यामुळे फॅन, एसी (वातानुकुलन साहित्य) या साधनांचा वापर वाढलेला आहे. परिणामी विजेची मागणीतही वाढ आहे. राज्यात दररोज सध्या २८ हजार मेगॉवॉट विजेचा वापर होत आहे. त्यामुळे आवश्यक जादाची विज अन्य मार्गाने खरेदी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. सर्वाधिक विज दुपारच्या सत्रात वापरण्यात आहे. या कालावधीत सर्वाधिक वातुकूलीत साधनांचा वापर केला जात आहे. मागणीच्या तुलनेत विजेचा पुरवठा न झाल्यास महावितरणकडून अत्यावश्यक भारनियमनाचा अवलंब करण्यात येणार आहे. विज चोरी, बिल वसूलीचे प्रमाण यानुसार भारनियमनासाठी महावितरणने फिडरनिहाय गट बनविलेले आहेत. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व फिडर हे ए, बी, सी, डी यामध्ये मोडतात. त्यामुळे अत्यावश्यक भारनियमनाचा अवलंब केल्यास रत्नागिरी जिल्ह्यात त्याची अंमलबजावणी होणार नाही. याला महावितरणकडूनही दुजोरा मिळाला आहे. जिल्ह्यात विजेचा वापर करणारे ग्राहक ५ लाख ७ हजार ८०० आहेत. जानेवारी महिन्यात ग्राहकांकडून दिवसाला १४३ मेगॉवाट विजेचा वापर केला जात होता. मार्चनंतर वीज वापरात वाढ झाली आहे. सध्या प्रतिदिन १५५ मेगावॉट विज वापरली जात आहे.