रत्नागिरीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ‘आप’ स्वबळावर लढणार

रत्नागिरी:- येथील आम आदमी पार्टीच्या (आप) पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच ‘आप’च्या मारुती मंदिर येथील कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत स्थानिक स्वराज्य निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेण्यात आला.

‘आप’ च्या वतीने महाराष्ट्र सुराज्य मोहीम १ मेपासून सुरू करण्यात आली असून, या मोहिमेच्या निमित्ताने “आप”चे वरिष्ठ पदाधिकारी संपूर्ण महाराष्ट्रभर दौरा करत आहेत. १० मे रोजी ते रत्नागिरीतील कार्यकर्त्यांची भेट घेण्यासाठी आले होते. चला एकत्र येऊन अन्यायाविरुद्ध आवाज उठवूया, फुले, शाहू, आंबेडकर, छत्रपती शिवरायांच्या स्वप्नातली स्वराज्य साकार करूया, न्याय, क्षमता आणि सन्मान यासाठी अखंड प्रयत्न करू हा उद्देश ठेवून ‘आप’चे महाराष्ट्र राज्यातील समितीचे सचिव डॉ. अभिजीत मोरे, राज्य संघटक डॉ. रियाज पठाण, ॲड. मनिष मोडक, संदीप देसाई, राज्य मीडिया नामदेव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक घेण्यात आली. यावेळी रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष डॉ. रवी जाधव, रत्नागिरी तालुका अध्यक्ष प्रकाश गुरव, जिल्हा उपअध्यक्ष ज्योती पाटील, जिल्हा सचिव हबीब बावानी, सचिन आपीप्टे, खालील वस्ता, नाझीम मजगावकर, जिया मुल्ला, हबीब सोलकर, मुफित नाईक यांच्यासह रत्नागिरी जिल्हा कार्यकारणीतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.