रत्नागिरीत सणासुदीत गॅसचा तुटवडा; चाकरमानी अन् स्थानिक हैराण

युद्धजन्य परिस्थितीचा फटका, नंबर लावल्यापासून आठ दिवसाने मिळतोय गॅस सिलेंडर

रत्नागिरी:- एकीकडे कोकणात शिमगोत्सव मोठ्या जल्लोषात, उत्साहात सुरू आहे.  तसेच मुस्लिम धर्माचा पवित्र रमजान महिना सुरू आहे. दुसरीकडे इस्रायल- अमेरिका, इराण युद्ध पेटले आहे. त्यामुळे त्याचा फटका पेट्रोल- डिझेल बरोबर आता गॅस पुरवठ्यावर होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ऐन सणासुदीत गॅस सिलेंडरची टंचाई भासत आहे. बुकिंग नंबरही लागत नाही. काही ठिकाणी नंबर लागल्यानंतर आठ आठ दिवस गॅस सिलेंडरचा पुरवठा होत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे जिल्हा पुरवठा विभाग, गॅस एजन्सी धारकांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.

 शिमगोत्सव निमित्त लाखोंच्या संख्येने मुंबई पुणे येथून चाकरमानी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. मोठ्या उत्साहात होलिका दहन, जिल्ह्यात शिमगा आणि मुस्लिम धर्माचे पवित्र रमजान महिना सुरू असल्यामुळे गॅस सिलेंडर मोठ्या प्रमाणात लागते. काहीच दिवसापूर्वी जिल्हा शासनाच्या वतीने बैठक घेऊन गॅस , पेट्रोल डिझेलचा साठा मुबलक ठेवा, टंचाई भासवू  देऊ नका अशा सूचना दिल्या होत्या. मात्र  ऐन सणासुदीत गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणू लागला आहे.  इस्रायल- इराण युद्ध वाढल्यामुळे त्याचा फटका बसण्यास  सुरुवात झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सोने- चांदीच्या दरात ही वाढ झाली आहे. आता गॅस सिलेंडरचा पुरवठा कमी पडत आहे. त्यामुळे नागरिकांना वेळेत गॅस सिलेंडर मिळत नाही. बुकिंग केल्यानंतर एक आठवड्याने गॅस सिलेंडर मिळत आहे. तर काही ठिकाणी बुकिंग नंबर बंद लागत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. गॅस सिलेंडरबाबत कोणतीही तक्रार आली नसल्याचे गॅस एजन्सीच्या वतीने सांगण्यात आले. त्यामुळे ऐन सणा निमित्त आलेल्या चाकरमान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन गॅस सिलेंडर पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी वाढत आहे.